
Raigad News : खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी रायगडमधील शेतकरी नव्या बियाण्यांसह माती परीक्षण करून कोणते पीक किंवा फळझाडे लागवड करावीत, याचा निर्णय घेत आहेत. आतापर्यंत २३ हजार ७३८ माती नमुन्यांची चाचणी प्रयोगशाळेत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील २४ हजार २५९ माती व पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे लक्षांक कृषी विभागाला देण्यात आले आहे. यापैकी कृषी विभागाला २३ हजार ७३८ नमुने प्राप्त झाले आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण चाचणी प्रयोगशाळेने १४ हजार ६१५ माती नमुने तपासले असून उर्वरित नमुने तपासण्यासाठी अशासकीय मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एक लाख ७९ हजार शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका देण्याचे उद्दिष्ट आहे. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून भौगोलिक नकाशावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातदेखील पिके घेतली जातात. आंबा उत्पादन घेतले जाते. असे असतानाही रायगडातील शेतकरी स्वत:च्या आरोग्याबरोबरच आता धन-धान्य देणाऱ्या काळ्या आईच्या आरोग्याची तपासणी करताना दिसून येत आहे.
माती परीक्षणानुसार पिकाची किंवा झाडांची लागवड केल्यास वाढ, त्यांची फळधारणा चांगल्या प्रकारे होऊ शकते. काही ठरावीक प्रकारच्या मातीमध्ये ठरावीक पिके घेणे योग्य असते. यासाठी शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे उपयुक्त व हानिकारक घटक समजण्यासाठी माती व जमिनीला देण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
जमिनीच्या आरोग्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे व तिचे आरोग्य शाश्वत स्वरूपात जतन करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्यपत्रिका देण्यात येत आहेत. मार्चअखेर सर्व माती नमुने आणि जमीन आरोग्यपत्रिका वाटपाचे नियोजन केले आहे.
माती परीक्षण केल्याचे फायदे
माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्याची उपलब्धता यानुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षार, घनता आदी दोष दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक अन्नद्रव्य मात्रा याआधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते.
अवाजवी खतामुळे बिघडते आरोग्य
अधिक उत्पादन मिळण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर आदींमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. यामुळे पिकाची खुरटलेली वाढ, उत्पादन क्षमतेमध्ये घट आदी बाबी दिसून येत आहेत. शेती नियोजनात जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.