Latur News : पावसाळा सुरू होताच भूजलाची पातळी वाढून हातपंप, विद्युतपंप, आड व विहिरी आदी सार्वजनिक स्रोतांचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यातूनच गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर इत्यादी जलजन्य आजार उद्भवतात. याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागात मिशन जलस्रोत शुद्धीकरण मोहीम हाती घेतली असून, मोहिमेत येत्या आठ जुलैपर्यंत पंधरा दिवसांत चार हजार ९१७ स्रोतांतील पाणी शुद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी ही माहिती दिली. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता असते.
यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हातपंप, विद्युतपंपाचे क्लोरीन वॉश करणे, तसेच आड-विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच पद्धतीने मोहीम राबविल्यामुळे जलजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यास मदत झाली.
आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, जलसुरक्षक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणानंतर स्रोतांचे पाणी नमुने पुन्हा एकदा प्रयोग शाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. यात नमुने दूषित आढळल्यास नियमितपणे जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण होणार आहे. मोहिमेत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे.
शुद्धीकरण करण्यात येणारे स्रोत
एकूण स्रोत ४९१७
नळ पाणीपुरवठा विहिरी ८५५
हातपंप/विद्युतपंप/दुहेरीपंप ३१५४
सार्वजनिक आड/विहिरी ९०८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.