
Onion Rate : राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे दैना केल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
कांद्याचा प्रश्न चिघळत चालल्याची दखल घेऊन केंद्र सरकारने अखेर मंगळवारी (ता. ८) एक महत्त्वाची घोषणा केली.
सरकारने नाफेड (Nafed) आणि नॅशनल कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह फेडरेशन (एनसीसीएफ) या दोन संस्थांना तातडीने बाजारात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांकडून लाल कांदा खरेदी (Buy onions) करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कांद्याचे भाव प्रति किलो दोन रूपयांवर घसरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात नेण्याऐवजी शेतातच गाडून टाकायला सुरुवात केली आहे. नाशिकसह राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘‘महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत,’’ असे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला मागणी व पुरवठ्यातील सातत्य आणि निर्यात यामुळे कांद्याचे दर स्थिर होते; परंतु फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर विशेषतः महाराष्ट्रात कोसळले, असे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
कांद्याचे दर कोसळल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोरदार आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे कांद्याला उठाव मिळून दरात सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांना तातडीने शेतकऱ्यांकडून लाल कांदा खरेदीच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच हा कांदा समांतरपणे देशातील इतर भागांत लगेच विक्रीसाठी पाठवला जाणार आहे. नाफेडने यापूर्वीच लाल कांद्याची खरेदी सुरू केली आहे. पण त्याचे प्रमाण खूप कमी आहे.
‘नाफेड’ने २४ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू केली असून आतापर्यंत ४००० टन कांदा खरेदी केला आहे. नाफेडने ४० खरेदी केंद्र सुरू केली आहेत.
साधारणपणे प्रति किलो ९ रुपये दर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. ‘नाफेड’ने खरेदी केलेला दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची इ. ठिकाणी विकण्यासाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून कांद्याचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यासाठी भाव स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून खरेदी करत आहे. नाफेडने गेल्या हंगामात २.५१ लाख टन रब्बी कांद्याची खरेदी केली होती. यंदाही २.५० लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
परंतु सध्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो लाल कांद्यामुळे हा लेट खरिपाचा कांदा असतो. त्याची टिकवणक्षमता कमी असते. त्यामुळे नाफेड कधी लाल कांद्याची खरेदी करत नाही.
यंदा अपवाद म्हणून नाफेड लाल कांद्याच्या खरेदीत उतरले आहे. परंतु हे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.
नाफेड खरेदीवर शेतकऱ्यांचे आक्षेप
‘नाफेड’ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा काही काळाने पुन्हा बाजारात ओतत असल्यामुळे दर पडतात, नाफेडची खरेदी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बाजारात भाव पाडून ग्राहकांचे हित साधण्यासाठी असते, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे.
यंदा देशातील कांदा उत्पादन वाढून ३१८ लाख टनावर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ३१६.९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.