
Nashik News : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी जवळपास ५ लाख टन उन्हाळ रब्बी कांद्याची खरेदी झाली. एकीकडे खरेदी करताना अनेक गैरव्यवहार होऊनही याकडे ‘एनसीसीएफ’ व्यवस्थापनाने डोळेझाक केली. तर आता निष्कृष्ट आणि सडका कांद्याची विक्री दिल्लीसारख्या शहरात विक्री केंद्रावर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीनंतर पुरवठा, विक्रीत गैरव्यवहार चर्चेत आला आहे.
कांदा खरेदी करताना आकार, रंग, प्रतवारी असे अनेक निकष लावण्यात आले. यामध्ये ६३ टक्के ए ग्रेड, तर २२ टक्के बी ग्रेड कांदा देणे बंधनकारक होते.एकीकडे सप्टेंबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने कांद्याचा पुरवठा मोठ्या शहरांमध्ये होत आहे.
मात्र दिल्लीत खराब व सडलेला कांदा विक्रीने पुन्हा हा गौडबंगाल समोर आला आहे. एकीकडे ग्राहकांसाठी खरेदी सुरू असताना ही खरेदी शेतकऱ्यांसाठी सुरू असल्याची बतावणी केंद्रीय मंत्र्यांसह, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षात ग्राहकांना सडका कांदा पुरविला जात असल्याने आता ग्राहक फसविला जात आहे.
खरेदी केल्यानुसार गुणवत्तेचा कांदा विक्रीसाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र मोठा गैरव्यवहार पुढे येत आहे. त्यामुळे ‘एनसीसीएफ’चे अधिकारी, राजकीय नेते व व्यापाऱ्यांच्या महासंघांची मिलीभगत आहे. ठरावीक अधिकारी व काही नेते, व्यापाऱ्यांनी मलई खाऊन खरेदी बदनाम केली. त्यामुळे तोटा सोसलेल्या शेतकऱ्यांच्या संबंधित महासंघाच्या संचालकाचे दिवाळे निघाल्याने ते संतप्त असून आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत.
‘बफर स्टॉक’ करताना महासंघानी प्रतवारीचा कांदा खरेदी केल्याने समर्थन ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष विशाल सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी केले. मात्र आता पुरवठा व विक्री होताना कांदा गेला कुठे, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.
मागील महिन्यात रेल्वेद्वारे ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’चा कांदा दिल्लीसाठी कमी आकार व दुय्यम प्रतवारीचा कांदा जात असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गोरख संत यांनी पुराव्यासह भांडाफोड केला होता. मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष झाले. तर आता थेट विक्रीत सडका कांदा विक्री झाल्याचे समोर आल्याने या बाबत सरकार गांभीर्याने पाहणार की नाही, असा सवाल शेतकरी व शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
अगोदर शेतकऱ्यांची, आता ग्राहकांची फसवणूक
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत १४१ ठिकाणी प्रतिकिलो ३५ रुपये दराने विक्री होत आहे. मात्र हा कांदा निकृष्ट दर्जाचा असून तो कृषी, ग्राहक व्यवहार विभागाच्या कार्यालय परिसरात विक्री होत असल्याने राजरोस गैरव्यवहार कोणाच्या आशीर्वादाने असा सवाल आहे.
विक्री होत असलेल्या कांद्याची आवरण निघालेले, कोंब आलेले, आकाराने लहान कांद्याची विक्री होते आहे. त्यामुळे बफर स्टॉकमधील गुणवत्तेचा कांदा कुठे गेला? की खरेदी केलाच नाही की खरेदी करून दरवाढ झाल्यानंतर विक्री करून खराब कांदा रेल्वेने पाठविला. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांची, आता ग्राहकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.