Pune Water Shortage : पुणे जिल्ह्यात मे अखेरीस पाणीटंचाई तीव्र

Drought Condition in Pune : धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यात २५२ टँकरने पाणीपुरवठा.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : मागील दोन ते तीन दिवस उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याची मोठी मागणी वाढली होती. यामुळे धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील १७८ गावे आणि १ हजार ३१६ वाडयांवर अधिक वाड्या वस्त्यांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असून ४ लाख ४ हजार २७० नागरिकांना २५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून पाण्याअभावी पिके करपली आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घालत मोठे नुकसान केले. दरम्यान, हा पाऊस मुरवणीचा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवाय जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरे कशी जगवायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

ग्रामीण भागात पाण्याचे साठे कोरडे पडल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून निवडणुकीत व्यग्र असलेले प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री आता तरी पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का?

असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या पुरंदर तालुक्याला बसल्या असून तालुक्यात ४० गावे ३५३ वाड्यावस्त्यांमधील १ लाख ६ हजार ८८९ लोकसंख्येला ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Water Shortage
Water Shortage : शहापूर तालुक्यात पाणीटंचाई आणखी तीव्र

पशुपालक अडचणीत

जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहेत. पाणीटंचाईच्या झळांसह चारा भाववाढीची कुऱ्हाड त्याच्यावर कोसळलेली आहे. एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने भाववाढीच्या संकटाला पशुपालकांना सामोरे जावे लागत आहे. कडबा, हिरवा चारा तसेच सरकी पेंडीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

पाणीपातळी खालवली

मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे धरणे, तलावांमध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात राहिला होता. तसेच उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळीदेखील खाली गेली. काही ठिकाणी विहिरी आटल्या आहेत, तर बोअरवेल बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक शेतकरी कवडीमोल भावाने जनावरे विकत आहेत.

हिरवा चाऱ्याचे दर वाढले

सुरुवातीला हिरव्या चारा २ हजार रुपये पांड (१ पांड म्हणजे दोन गुंठे) येत होता, सध्या यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता हिरव्या चारा ४ हजार ते ४५०० रुपये (मका) एक पांड येत असून यात २ हजार ते २५०० रुपयांची वाढ झाली आहे. बागायती भागात ऊस २ हजार ते २५०० रुपये मिळत होता, आता तो ४ हजार ते ४५०० रुपये झाला असून दरात दोन हजारांनी वाढ तर जिरायती भागात ३ हजार ते ३५०० रुपये पांड होता तर आता तो थेट ८ हजार रुपये पांड झाल्याने दरात तब्बल ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या

तालुका --- टँकर -- गावे -- वाड्यावस्त्या --- लोकसंख्या
पुरंदर --- ८७ --- ४० --- ३५३ --- १०६८८१
बारामती --- २८ --- १७ --- २०७ --- ४३८९६
हवेली --- २६ --- ७ --- २२ --- ३२३११
आंबेगाव --- २३ --- २९ --- १५८ --- ४०१५२
जुन्नर --- २० --- १८ --- १०४ --- २३४७३
इंदापूर --- १९ --- २० --- २०६ --- ७३४८०
खेड --- १४ --- १६ --- १२० --- २९८८६
शिरूर --- १२ ---७ --- ५९ --- २२८२९
दौंड --- १० --- ७ --- ८१ --- १६३३८
भोर --- ९ --- १६ --- ५ --- १३०८७
राजगड --- ४ --- ४ --- १ -- १९३७
एकूण --- २५२ --- १८१ --- १३१६ --- ४०,४२,२७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com