
Pune News : राज्यात सर्वांत मोठी असलेली पुणे जिल्हा सहकारी बँक ही शेतकरीभिमुख बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेमार्फत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना खेडेगावांमधील व शहरी भागांमधील प्रत्येक खातेदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. या बँकेकडून कर्जाच्या योजना शेतकऱ्यांपर्यत पोहोचणे हा अतिशय चांगला उपक्रम आहे, अशी प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने हवेली विभागाकरिता केंद्र शासन, राज्य शासन व विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती कार्यशाळा रविवारी (ता. १८) आयोजित केली होती. त्या वेळी श्री. बनसोडे बोलत होते.
या वेळी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महावितरणचे महाराष्ट्र राज्याचे मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, संचालक सुरेश घुले, प्रवीण शिंदे, विकास दांगट, निर्मला जागडे, पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, पुणे मार्केट कमिटीचे संचालक रोहिदास उंद्रे आदी उपस्थित होते.
श्री बनसोडे म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात १०८ वर्षांपूर्वी १३७ सभासद आणि सुरुवातीला ५१ हजार भाग भांडवलावर सुरू झालेली ही सहकारी संस्था आहे. आज १७ हजार कोटी भांडवल, १२ हजार कोटी ठेवी असलेली जिल्ह्यातील शहरी व विशेषतः ग्रामीण भागात २९० शाखा विस्तार असलेली राज्यातील ही एक नंबरची जिल्हा बँक आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, महामंडळे यांच्या कर्ज योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या योजनांचा त्यांना लाभ व्हावा, या पारदर्शक हेतूने आयोजित केलेल्या या कार्यशाळेतून मार्गदर्शन घेऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल.
शासन सामान्य जनतेसाठी हिताच्या योजना राबवीत आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजना असेल, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान पीकविमा योजना, शेतीपंपासाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री सौर पंप योजना, वैद्यकीय उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना, घरकुल योजना, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अशा अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवित आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, की शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. फक्त अनुदानासाठी व्यवसाय करू नये. तो व्यवसायासाठी व्यवसाय करून तशी कर्जाची प्रकरणी तयार करावीत. फक्त अनुदान लाटण्यासाठी ते न करता आपल्या भागाची गरज काय आहे, ते खरेच करता येऊ शकते का, तेथे सर्व सुविधा आहेत का, याचा विचार करून व्यवसाय सुरू करावा. त्यापूर्वी यशस्वी झालेल्या व बुडलेल्या उद्योजकांची माहिती घेऊन व्यवसायाची निवड अंतिम करावी.
परंतु आज जे व्यवसाय सुरू करतात, त्यातील अनेक जण हे फक्त अनुदानासाठी व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. परंतु तो वैयक्तिक अधिकार आहे. मात्र, व्यवसाय वाढीस लागल्यानंतर नफ्यात आल्यानंतर कर्ज भरावे. त्यानंतर गरज पडल्यास टप्प्याटप्प्याने नवनवीन व्यवसाय वाढवायला पाहिजेत.
त्यासाठी सर्वोतपरी मदत जिल्हा बँकेमार्फत केली जाईल. बँक ही फक्त कर्ज घेतल्यानंतर ते जप्त करण्यासाठी नाही. ते बँकेचे पहिले प्राधान्य नसून व्यवसायाला मदत करण्याचे आहे. कार्यशाळेत बँकेचे संचालक प्रवीण शिंदे यांनी प्रास्तविक केले. तर रमेश बांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.