
Nagpur News : ‘शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस’ अशा घोषणाबाजी करीत विरोधकांनी मॉन्सूनोत्तर पावसामुळे बाधितांसाठी भरपाईच्या मुद्द्यावर विधान भवनाच्या पायऱ्यांवर गुरुवारी (ता.७) आंदोलन करण्यात आले. त्यावरूनच अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजणार असल्याचे स्पष्ट झाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुनील प्रभू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
या वेळी सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रत्येक वेळी नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचा दावा सत्ताधारी करतात. परंतु आर्थिक भरपाईच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न एकदाही झाला नाही.
त्यावरूनच सत्ताधाऱ्यांची केवळ नौटंकी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ‘शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर’, ‘विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी मात्र कंगाल’ अशा घोषणाही करण्यात आल्या. विरोधकांनी या वेळी गळ्यात विविध घोषवाक्ये असलेले फलक लटकविले होते.
‘बाधित शेतकऱ्यांना मदत द्या’
आयात शुल्कात वाढीमुळे बांगलादेशची संत्रा निर्यात ठप्प झाली आहे. सोबतच मॉन्सूनोत्तर पावसामुळे कपाशी, तूर पिकाचेही नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात संत्रा फळ, कपाशीचे बोंड असलेले हार घातले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.