
Mumbai News: शेतीमाल पेरणी ते कापणीपर्यंतचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मनरेगामधून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार) काही भार उचलावा, अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. यावर मनरेगातून मदत मिळावी यासाठी समितीमार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवू आणि रोजगार हमी योजनेतून (रोहयो) काही मदत देता येते का याचीही चाचपणी करू, असे आश्वासन कृषिमंत्री कोकाटे यांनी दिले.
शेतकरी कर्जमाफी, किमान हमीभाव आणि अन्य विषयांवर कृषिमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असे कोकाटे यांनी सांगितले.
उत्पादन खर्च कमी करण्याबाबत मनरेगामध्ये समावेश करण्याबाबत समिती स्थापन करून समितीकडून प्राप्त शिफारशीनुसार केंद्र शासनाला याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन या वेळी कोकाटे यांनी दिले. कोकाटे म्हणाले, की शेतीविषयक केंद्र शासनाच्या धोरणाबाबत सुधारणा करण्यासाठी राज्याच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. शेतीविषयक आयात-निर्यात धोरणाबाबत राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व केंद्रीय कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल.
शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सहजरित्या मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतीसाठी असलेली ॲग्रीस्टॅक ही डिजिटल ओळखपत्र प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवणार असून यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवणे, कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करणे, शेतकरी संघटनांकडून कृषिविषयक आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार कृषी योजनांत सुधारणा करण्यात येतील. पीकनिहाय माहिती घेऊन पीक पद्धती राबविण्याबाबत देखील शेतकऱ्यांना माहिती देवू. शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
‘शेणखताला सबसिडी द्या’
राज्यात सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केला जातो. जर रासायनिक खतांना सबसिडी दिली जात असेल तर शेणखताला का नाही, असा मुद्दा माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
‘कर्जमाफी देणार आहोत, पण...’
बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडू. त्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. महायुती सरकारने कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. ती आम्ही देणारच आहोत. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला की लवकरच तारीख जाहीर करू, असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.