
Orange Farming Irrigation :
शेतकरी नियोजन
पीक : संत्रा
शेतकरी : संकेत देशमुख
गाव : काजळी, ता. चांदूरबाजार, अमरावती
एकूण शेती : दहा एकर
संत्रा बाग : तीन एकर, ४०० झाडे
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या भागात सर्वाधिक संत्रा लागवड आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण ७० हजार हेक्टर संत्रा क्षेत्रापैकी सुमारे ६७ हजार हेक्टर याच दोन तालुक्यांत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील काजळी परिसरात सुमारे एक हजार एकर क्षेत्र संत्रा पिकाखाली आहे. या परिसरातील शेतकरी प्रामुख्याने आंबिया बहर घेऊन उत्पादन घेतात. या भागातील संकेत सुनीलराव देशमुख यांच्याकडे १४ वर्षे जुनी संत्रा बाग असून, त्यात ४०० झाडे आहेत. १६ बाय १६ फूट अंतरावर केलेली लागवड आणि योग्य व्यवस्थापनातून फळांचा दर्जा राखण्यावर त्यांचा भर असतो.
सिंचन व्यवस्थापन
संत्रा बागेमध्ये सिंचन व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. पाणी साचून राहण्यासह विविध कारणांमुळे फायटोप्थोरासह इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. आजही आम्ही पाटपाणी पद्धतीने सिंचन करत असलो, तरी झाडांच्या खोडांना पाणी प्रत्यक्षात लागणार नाही, या दृष्टीने नियोजन करतो. बागेत झाडापासून चार फूट अंतरावर दांड काढले आहेत. त्यामुळे पाण्याचा संबंध झाडाच्या खोडाशी न आल्याने बाग कीड-रोगमुक्त राहते. त्याच सोबत झाडांच्या विस्तारीत मुळांनाही पाणी उपलब्ध होते. अंबिया बहर घेण्यासाठी नोव्हेंबरपासून बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर थेट जानेवारीतच पाणी देण्याचे नियोजन राहते. जानेवारीत बागेला पाणी दिल्यानंतर फेब्रुवारी, मार्च याप्रमाणे एक महिन्याचा गॅप दिला जातो. आमच्या भागात भारी जमिनी असून, त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. अशा जमिनीमध्ये पाणी जास्त झाल्यास पाने पिवळी पडतात. तसेच फायटोप्थोराही वाढत असल्याचा अनुभव आहे. एक महिन्याच्या कालावधीने पाणी देण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे.
अंबिया व्यवस्थापन
तोडणी झाल्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला झाडावरची वाळलेली सल काढली जाते. त्याकरिता छाटणी करताना धारदार सिकेटर किंवा कात्रीचा वापर केला जातो. छाटणीदरम्यान झाडाला झालेल्या इजांमधून बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. त्यासाठी लिटमस पेपरच्या साह्याने तपासून पाण्याचा सामू (पीएच) योग्य ठेवला जातो.
पालाशयुक्त खतांसोबत निंबोळी पेंड मिसळून प्रति झाड एक किलो याप्रमाणे दिले जाते. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून झाडे निरोगी राहतात, असा आमचा अनुभव आहे. बागेमध्ये येणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवले जाते. या रसशोषक किडीच्या माध्यमातून सिट्रस ग्रिनिंगचा प्रादुर्भाव वाढून बाग धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या किडींच्या प्रतिबंधासाठी फवारणीचे योग्य त्या पद्धतीने नियोजन केले जाते. त्यात कोळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही कोळीनाशकाचीही फवारणी अंतर्भूत केली जाते.
गेल्या दहा दिवसांतील कामे
- संत्रा बागेत पाणी दिले.
- पाणी दिल्याने फळाचे वजन आणि चकाकीही वाढते.
- संत्रा फळांची तोड करण्यात आली.
पुढील वीस दिवसांतील नियोजन
- संत्रा फळांची तोड झाल्यानंतर बागेत तणांच्या नियंत्रणावर भर देणार आहे.
- झाडावरील वाळलेल्या फांद्या तसेच सल काढणे.
- सल काढल्यानंतर बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे.
- त्यानंतर पुढील बहराकरिता बाग ताणावर सोडण्याचे नियोजन आहे.
संकेत देशमुख : ९४०३४१००४७
(शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.