
Sangli News : राज्यात डाळिंबाचा हस्त बहर सप्टेंबर महिन्यात धरला जातो. सप्टेंबर-ऑक्टोबर अखेर पाऊस झाला. परिणामी बहर लांबणीवर पडला. अशा परिस्थितीही शेतकऱ्यांनी बहार धरण्याचे धाडस केले. परंतु, कळी निघण्यास अडचणी आल्या.
त्यामुळे हस्त बहरातील अडचणी वाढल्या असून सेटिंग नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. परिणामी, फळांची संख्याही कमी होईल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांसह अनेक भागांत हस्त बहार धरला जातो. राज्यात दर वर्षी अंदाजे ३० हजार हेक्टरवर हस्त बहार धरला जातो. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने पुरेसा पाणीसाठा झाला नाही. पाणीटंचाईमुळे गतवर्षी हस्त बहार १० हजार हेक्टर क्षेत्रावर साधला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले.
यंदा राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी हस्त बहर सप्टेंबर महिन्यापासून धरण्यास प्रारंभ केला आहे. काही भागात आगाप हस्त बहार धरला जातो. तसेच सप्टेंबर ते ऑक्टोबर हा बहर धरला जातो. मात्र, याच दरम्यान, परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आगाप धरलेल्या बागांमध्ये कळी गळ झाली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस असल्याने बहर लांबणीवर पडला.
परंतु अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी बागा धरण्याचे धाडस केले. परंतु बागेला पुरेसा ताण बसला नाही. परिणामी फुटवे वाढले, कळी निघण्यास अडथळे निर्माण झाले. कळीगळ अशा समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्या. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे परागीकरण होण्यास अडचणी येऊ लागल्या असल्याने अपेक्षित कळी निघाली नाही. त्यामुळे फळांची संख्याही कमी होईल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पाणीटंचाईचे संकट नाही
गत वर्षी पाणीटंचाईमुळे ३० हजार हेक्टरवर धरला जाणारा हस्त बहार १० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी साधला. अर्थात हस्त बहरातील २० हजार हेक्टवरील क्षेत्र आंबिया बहार धरण्यासाठी शेतकरी पुढे आले. यंदा मुबलक पाणी आणि पोषक वातावरण असल्याने शेतकरी पुन्हा हस्त बहार धरण्यासाठी पुढे आले. त्यामुळे राज्यात या वर्षी शेतकऱ्यांनी ३० हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा साधल्या. नाशिक, अहिल्यानगर या भागांत पाऊस झाला. परंतु या पावसाचा परिणाम डाळिंबावर फारसा झाला नाही.
‘डाळिंब संघ म्हणते पीक चांगले...’
यंदाच्या हस्त बहरातील डाळिंबाला पोषक वातावरण आहे. डाळिंबांची संख्याही चांगली मिळाली आहे. सद्यःस्थितीला डाळिंब १०० ते १२० ग्रॅम वजनाचे आहे. मात्र, शेतकरी सांगतात की, हस्त बहर धरण्यापासून वातावरणातील बदल आणि परतीचा पाऊस याचा फटका या बहाराला बसला आहे. पूरक वातावरण असल्याने पीक चांगले असल्याचा दावा डाळिंब संघाने केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.