Farmer Protest Delhi : शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रुधारा नळकांड्याचा वापर सुरूच; दुसऱ्या दिवशी आंदोलनात काय काय घडलं?

६० शेतकरी जखमी झाल्याचा शेतकरी आंदोलकांचा आरोप आहे. शेतकऱ्यांत आपपासात संपर्क राहू नये म्हणून हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या सीमाभागातील इंटरनेट आणि मोबाइल मेसेजची सेवा बंद करण्यात आली आहे.
Farmer Protest Delhi : शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रुधारा नळकांड्याचा वापर सुरूच; दुसऱ्या दिवशी आंदोलनात काय काय घडलं?
Published on
Updated on

देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या अश्रुधारा नळकांड्याच्या वापर बुधवारीही (ता.१४) सुरूच आहे. एरवी सुसाट वेगानं धावणारी वाहनं या शंभू सीमेवर पाहायला मिळतात. पण सध्या याच शंभू सीमेवर सध्या पोलिस आणि सैन्यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. त्यामुळं दिल्ली आणि हरियाणाच्या सीमाभागाला पोलिस छावण्यांचं स्वरूप आलं. हमीभाव कायद्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनी संयुक्त किसान मोर्चा अराजकीयच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारी रोजी 'चलो दिल्ली'चा नारा दिला. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर मंगळवारी (ता.१३) शंभू सीमेवर ड्रोनद्वारे अश्रुधारा नळकांड्याचा भडिमार करण्यात आला. त्यासोबतच पाण्याचे फवारे मारून आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तरीही शेतकरी मागे हटले नाहीत.

पोलिस छावणीचं स्वरूप

बुधवारी (ता. १४) आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी शंभु सीमेवर घग्गार नदीच्या पुलावर पोलिस उभे आहेत. पोलिस शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मिंटच्या रिपोर्टनुसार मंगळवारी (ता.१३) पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी केलेल्या अश्रुधारा नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यासोबत पोलिस लाठीचार्जमुळे ६० शेतकरी जखमी झाल्याचा शेतकरी आंदोलकांचा आरोप आहे. शेतकऱ्यांत आपपासात संपर्क राहू नये म्हणून हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या सीमाभागातील इंटरनेट आणि मोबाइल मेसेजची सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात सोमवारपासूनच जमावबंदी लागू करण्यात आली. मंगळवारी सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू या सीमेवर पोलिसांनी फौजफाटाही वाढवला आहे. आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकरी आंदोलकांचं धरपकड सत्र चालवलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा टिकरी, सिंघू सीमेवरही सिमेंट आणि लोखंडी बॅरीकेट्स उभारले आहेत. यामध्ये ६ फुट ऊंचीचे बॅरिकेटचा समावेश आहे. त्यासोबतच रिकाम्या कंटेनरमध्ये वाळू आणि माती भरून रस्त्यावर उभे करण्यात आलेत. शंभू सीमेवर रस्त्यावर सिमेंट टाकून त्यात जाडजुड आकाराचे लोखंडी खिळे रोवले गेलेत. दिल्लीच्या सर्व सीमा बंद पूर्णत: बंद करण्यात आल्या आहेत.

Farmer Protest Delhi : शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रुधारा नळकांड्याचा वापर सुरूच; दुसऱ्या दिवशी आंदोलनात काय काय घडलं?
Delhi Farmers Protest : 'जो पेरू शकतो,... तो'; खासदार कोल्हे यांचा मोदी सरकारला इशारा

सलग दुसऱ्या दिवशी संघर्ष सुरूच

बुधवारी सकाळी शंभू सीमेवर दहा वाजता शेतकऱ्यांनी बॅरिकेट हटवण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधारा नळकांडयांचा शेतकऱ्यांवर भडिमार केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर शेतकरी ३०० मीटर मागे फिरले. काही वेळानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा सीमेकडे कूच केली. त्यावेळी पुन्हा पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा भडिमार केला. दुपारी ३ वाजेपर्यंत पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरूच होता. विविध रिपोर्टनुसार आंदोलक शेतकऱ्यांची संख्या २ हजारांहून अधिक आहे. आंदोलक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हरियाणातील विविध जिल्ह्यातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सीमेकडे निघाले आहेत. आदोलक शेतकरी शंभू सीमेवर ठिय्या ठोकून आहेत. अधूनमधून पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये गदारोळही उडतोय. दिल्ली पोलिसांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करत सीमेवर हजर राहण्याचे आदेश दिलेत.

राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप

केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना संवादातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. शेतकरी आंदोलनामुळे सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत होईल, अशी परिस्थिती उद्भवू नये, अशीही विनंती मुंडा यांनी केली. यावर बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना मजूर नेते सरवन सिंह पंढेर म्हणाले, "सरकार आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सरकारशी संघर्ष करण्यासाठी आलो नाहीत," असंही पंढरे म्हणाले. कॉँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सरकारवर टीका केली. "रस्ते अडवणे, फौजफाटा तैनात करण्याऐवजी सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करणे योग्य ठरलं असतं." असं पायलट म्हणाले. "भाजपने नेहमीच शेतकऱ्यांना साथ दिली आहे. आमच्या सरकारने त्यांच्यासाठी काम केले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा रद्द?

दरम्यान, राहुल गांधी यांनी झारखंडमधील 'भारत जोडो न्याय यात्रे'चा दुसरा टप्पा रद्द केल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे. पीटआयच्या माहितीनुसार, दिल्लीत  सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीला जावं लागल्यानं यात्रेचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आला. सकाळी राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील जखमींशी फोनवरून संवाद साधला.

डल्लेवाल यांचाही चर्चेतून मार्ग काढण्याचा आग्रह

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चर्चेतून मार्ग काढू असं माध्यमांना बोलताना सांगितलं. त्यावर संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजीत सिंह डल्लेवाल म्हणाले, आम्ही त्यांना चर्चेतून मार्ग काढण्यासाठी संधी देत आहोत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सरकारनं चंदीगढ वा आंदोलन स्थळावर कुठेही चर्चा करावी. असं डल्लेवाल म्हणाले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी संपूर्ण दिल्लीच्या सीमाभागांना पोलिस छावणीचं स्वरूप आलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com