Pesticide Use : कीडनाशकांच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Supreme Court : कीडनाशके व अन्य रसायनांचा पिके व अन्नपदार्थात होणारा अतिवापर आणि त्यामुळे होणारे मृत्यू थांबविण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Pesticide
Pesticide Agrowon

New Delhi News : कीडनाशके व अन्य रसायनांचा पिके व अन्नपदार्थात होणारा अतिवापर आणि त्यामुळे होणारे मृत्यू थांबविण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाकडून केंद्र सरकार व संबंधित संस्थांकडून उत्तराची वा खुलाशाची मागणी करण्यात आली आहे.

वकील आकाश वशिष्ठ यांच्या वतीने यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पंडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने केंद्रीय कृषी मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाणके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि अन्य संस्थांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून यासंदर्भात उत्तर मागविले आहे.

Pesticide
Pesticide Information : कीटकनाशक माहितीपत्रकातील अक्षरांच्या आकार तपासणार

याचिकाकर्त्याने कीटकनाशकांमुळे होणाऱ्या मृत्यूंची मोठी आकडेवारी देशभरातून संकलित केल्याचे यावेळी ज्येष्ठ वकील अनिथा शेणॉय यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, मूषकनाशके आणि अन्य रसायनांचा अन्नपिके व अन्नपदार्थांमध्ये अतिवापर होतो. हाच वापर देशात कर्करोग व अन्य प्राणघातक रोग वाढण्यामागील प्राथमिक व मुख्य कारण म्हणून पुढे येत आहे.

कीडनाशके किंवा रसायनांच्या अति वापरामुळे पिकांमध्ये, हवेत आणि अन्नामध्ये प्रदूषण निर्माण होत आहे. हेच मानवासाठी ‘सायलेंट किलर’ ठरत आहे. अन्नात प्रदूषण निर्माण झाल्यानंतर कीडनाशकांमधील विष अन्नसाखळीत वेगाने पसरत जातो. त्याचा मोठ्या स्वरूपात संचय होतो. मानवी शरीरात हे विष गेल्यानंतर ते बाहेर काढणेही शक्य नसते.

Pesticide
Efficon Pesticide : ‘बीएएसएफ’चे ‘इफिकॉन’ कीटकनाशक बाजारात दाखल

नमुने आढळले दोषी

याचिकेत ‘एफएसएसएआय’ने उपलब्ध केलेल्या आकडेवारीचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार सन २०१५- १६ मध्ये ७२ हजार ४९९ अन्नाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १६ हजार नमुने भेसळयुक्त किंवा अप्रमाणित आढळले. यातील १४५० फौजदारी तर ८,५२९ दिवाणी खटले दाखल करण्यात आले.

त्यामध्ये ५४० प्रकरणे दोषी आढळली. सन २०१६- १७ मध्ये ७८ हजार ३४० नमुन्यांपैकी १८ हजार ३२५ नमुने भेसळयुक्त किंवा अप्रमाणित आढळले. दाखल केलेल्या एकूण १३ हजार ८० खटल्यांमध्ये १६०६ प्रकरणे दोषी आढळली असेही याचिकेत म्हटले आहे.

विषबाधेमुळे मृत्यू

या समस्येची तीव्रता आणि गांभीर्य मोठ्या प्रमाणात असूनही केंद्र सरकार आणि संबंधित संस्था कीडनाशकांच्या अति वापरासंबंधीच्या वाढत्या घटना रोखण्यामध्ये, नियंत्रित आणि कमी करण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. पीक संरक्षण, क्वारंटाईन व साठवणूक संचालनालयाच्या आकडेवारीनुसार सन २०२०-२१ मध्ये कीडनाशकांमुळे विषबाधा झाल्याची आठ राज्यांमध्ये नोंद झाली आहे.

यात अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, केरळ, मेघालय, राजस्थान, उत्तराखंड आणि पश्‍चिम बंगाल यांचा समावेश आहे. पैकी तीन राज्यांत १६१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कीडनाशकांचा होणारा वापर व अतिवापर यांच्या अनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा, पद्धती वा ढाच्यात सुधारणा व बदल करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशीही विनंती न्यायालयाकडे याचिकेतून करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com