
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, खासदार इम्तियाज जलिल यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला.
महावितरण, पीकविमा कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व काही अंशी कृषी विभाग सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या रडारवर होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीच्या आयोजन गुरुवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे प्रशासक विकास मीना, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, आमदार हरिभाऊ बागडे, खासदार इम्तियाज जलिल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी प्रास्ताविकात प्रस्तावित क्षेत्र तसेच येत्या खरीप हंगामाचे खत, बियाणे नियोजन आदींची सविस्तर माहिती दिली. खतविक्री करताना लिंकिंग करून त्याचे विक्री होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
बैठकीला सुरुवात होताचा आमदार श्री. बागडे यांनी गतवर्षीच्या बैठकीतील अनुपालनाच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरणे सुरू केले. श्री. बागडे म्हणाले, की अधिकाऱ्याअधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव असल्याने चार वर्षे झाले तरी बाबरा ते नाचनवेल दरम्यान पुलाचे काम थांबून आहे.
महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हाराकिरीमुळे हे सगळे घडते. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.
किती ठिकाणी नुकसान झाले, किती नुकसान भरपाई मिळाली, नुकसान भरपाई मिळण्याबाबतच्या अडचणींवर तक्रार करण्यासाठी कुठली यंत्रणा आहे का, बियाणे विक्रीवर बंधन घातले त्यांनी आपल्याला अपेक्षित बदल साध्य होईल का, बोगस कंपन्यांच वितरक आपल्या जिल्ह्यात आहेत का, विमा उतरवून मोकळ्या होणाऱ्या पीकविमा कंपन्या नंतर शेतकऱ्यांच्या संपर्कातच नसतात, आदी प्रश्न आमदार बागडे यांनी उपस्थित केले.
रस्त्यामुळे ग्रामस्थांचे काय हाल होताहेत याविषयी काही छायाचित्र बैठकीत पालकमंत्र्यांना सादर करून ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी खा. इम्तियाज जलिल यांनी केली.
कृषी महोत्सवासंबंधीच्या प्रश्नावर ना. दानवे आक्रमक
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी खरीप हंगामासाठी गावनिहाय पूर्वतयारी बैठक घ्या, रेंगेज मीटर किती वाढले, ते योग्य ठिकाणी आहे त्याची तपासणी होण्याची काही व्यवस्था आहे का, कांद्याचे अनुदान किती लोकांना मिळाले आदी प्रश्न करून सिल्लोड महोत्सवासाठी पैसे जमा केले, त्याचे काही आदेश होते का, यासंबंधीचे सर्व पुरावे असल्याचा दावा करत याविषयी खुलासा सभागृहात करण्याची मागणी केली.
हा प्रकार गंभीर असून, याप्रकरणी चौकशीची मागणी खा. इम्तियाज जलिल यांनी केली. पालकमंत्री श्री. भुमरे यांनी याविषयी माहिती घेऊ, असे सांगितले, तर अशा प्रकारचे कुठलेही आदेश नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.