
Chh. Sambhajinagar News : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या चार महिन्यांत चार सौर प्रकल्प सुरू करण्यात आले असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल.
या योजनेत एकाच हेतूने राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. अशा विकेंद्रित स्वरूपातील हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र कृषी वीजनिर्मिती कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
या योजनेत महावितरणच्या उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने शासकीय जमिनी घेण्यात येत असल्याचे महावितरणने कळविले आहे.
धोंदलगावात पहिला प्रकल्प
या योजनेतील राज्यातील ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोंदलगाव (ता.वैजापूर) येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात झाला. उपकेंद्रापासून साडेतीन किमी अंतरावरील १३ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला हा प्रकल्प धोंदलगाव ३३ केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. उपकेंद्रातून निघणाऱ्या ५ वीजवाहिन्यांवरील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.
वरखेडीत दुसरा प्रकल्प
जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा दुसरा प्रकल्प वरखेडी (ता. फुलंब्री) येथे उभारण्यात आला. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.
३० गावांतील २५७० कृषिपंपांना वीज
या योजनेतील जालना जिल्ह्यातील ६ मेगावॅट क्षमतेचा पहिला प्रकल्प हिवर्डी येथे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज ३० गावांतील २५७० कृषिपंपांना पुरवली जात आहे.
जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. ५ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून ६ गावांतील ११०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.