
Ahilyanagar News : वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी (ता. २२) ३८ वा पदवीप्रदान समारंभ झाला. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, नवी दिल्ली येथील कृषी शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अभयसिन्हा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आजचा दिवस पदवीधारक आणि पदक विजेत्यांसाठी आनंदाचा आहे. तुम्ही केवळ पदवीधर नाही, तर भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य आहात. २०४७ विकसित भारतामध्ये कृषीचा मोठा वाटा राहणार आहे. हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढविण्यात मदत करू शकतात.
कृषी पदवीधरांनी स्थानिक घटक लक्षात घेऊन पिकांचे वाण विकसित करावे. विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि अचूक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती पुरविणे गरजेचे आहे. राज्य शासन शेतीतील नवीन उपक्रम, उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
या वेळी पीएच.डी.च्या ८ विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या १९ विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली. या वेळी अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, जिल्हाधिकारी श्री. पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अधीक्षक राकेश ओला, माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. एम. सी. वाष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, डॉ. प्रदीप इंगोले, दत्तात्रेय उगले, गणेश शिंदे, संजीव भोर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, डॉ. रवींद्र बनसोड, सदाशीव पाटील, हेमंत सोनार उपस्थित होते.
कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाचे साह्य : कोकाटे
कॄषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, ‘‘वातावरणतील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाच्या साह्यने अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. नव्या कल्पना, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती पद्धतीत बदल घडवून आणावे लागतील. फलोत्पादन आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करून निर्यातीवर भर देणेही गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.