
Farmer Issue : शेतकरी संघटनांनी दिल्ली चलोचा नारा देत शेतकरी आंदोलनाची तयारी सुरू केली. तर संसदेत मंगळवारी (ता.३) सोयाबीन कापूस हमीभाव खरेदी, पिकविमा, शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. सोयाबीन कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. तरीही सरकारची खरेदी अत्यल्प आहे, सरकारी खरेदीची स्थिती नेमकी काय आहे, २०२३-२४ मध्ये किती शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला, त्याची आकडेवारी काय? याबद्दल गडचिरोली चिमुर मतदारसंघ कॉँग्रेसचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी प्रश्नोत्तराच्या तासात कृषीमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला.
कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी उत्तर देण्यासाठी उठले, पण त्यांच्याकडे सोयाबीन कापूस खरेदी आणि पिकविम्याची आकडेवारी नव्हती. त्यामुळं राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांची मोठी अडचण झाली. त्यांनी विषयाला फाटा फोडत विरोधकांवर टिका केली. "मोदी सरकारने २०१४ ते २०२४ च्या दरम्यान २२ पिकांच्या हमीभाव दीडपट वाट केली. कॉँग्रेसने शेतकऱ्यांना फसवलं." असं चौधरी म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चौधरी यांना प्रश्नाचं नेमकं उत्तर द्या, असं सांगितलं. पण गणिताच्या पेपरला भूगोलाचा अभ्यास करून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी भगीरथ चौधरी यांची अवस्था झाली.
त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तेवढ्यात केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उभं राहून नेहमीप्रमाणे पंतप्रधान 'मोदीजी की सरकार' म्हणत बोलायला सुरुवात केली. "मागील दहा वर्षात धानाचा हमीभाव १३१० रुपये प्रतिक्विंटलवरून २३०० रुपये प्रतिक्विंटल केला. ज्वारीचा हमीभाव १५०० रुपये प्रतिक्विंटल होता. मोदी सरकारने ३ हजार ३७१ रुपये केला." असं शिवराजसिंह सांगत राहिले.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीवरून कॉँग्रेस सरकारवर त्यांनी टिकाही केली. पण या सगळ्यात सोयाबीन कापूस दर, हमीभाव खरेदी, पीकविम्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न यावर शब्दही न उच्चारता चर्चा मोदींच्या गुणगानाकडे वळवली. त्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. आणि शेवटी सभागृहातून वॉक आऊट केलं. त्यातच प्रश्नोत्तराचा तास संपला.
संसदेचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू झालं. विरोधकांनी मणिपूर हिंसाचार, संभळ आणि संविधानवर चर्चेची मागणी केली. त्यावरून सभागृहात गोंधळ उडला. आणि कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर आज म्हणजे मंगळवारी कामकाज सुरू झालं. प्रश्नोत्तराच्या तासात पीएम किसान, पिकविमा, सरकारी खरेदी, दुप्पट उत्पन्न यावर प्रश्न उत्तर होणार होते. विरोधकांनी प्रश्न विचारले, पण त्याची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी दिलीच नाहीत.
कापूस दरावर देशमुख म्हणाले...
लोकसभेत यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी कापसाच्या पडलेल्या दराकडे लक्ष वेधलं. सोयाबीन कापसाचे भाव पडल्याने शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी देशमुख यांनी दिली. "शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमालाचे भाव पडल्याने अधिक होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याचं प्रमाण आहे." असंही देशमुख म्हणाले. पण या मुद्यांवर चर्चा झाली नाही. कृषीमंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.
आझाद कीर्ती झा यांची टिका
पश्चिम बंगालचे वर्धमान दुर्गापुरचे खासदार आझाद कीर्ती झा यांनी सरकरच्या मंत्र्यांच्या वर्तनावर कठोर शब्दांत टिका केली. १७ पैकी ९ खासदार शेती प्रश्नावर बोट आहेत. पण त्यावर सभागृहात चर्चा का होऊ दिली जात नाही, असं म्हणत झा यांनी खताच्या काळ्या बाजाराबद्दल प्रश्न उपस्थित केला. "सरकार गंधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधून बसलं आहे आणि खाजगी उद्योगवाले दुर्योधन झाले आहेत," असंही झा म्हणाले. तर लोकसभेत दिवसभर शेतीच्या प्रश्नावर विरोधकांनी अधूनमधून प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर सखोल चर्चा सत्ताधाऱ्यांनी केली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.