
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४८.३० टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्येही केवळ २६.२७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. उन्हाळ्याचे अजून सुमारे साडेतीन महिने जाणे बाकी आहे. त्यामुळे झपाट्याने घटणारा पाणीसाठा पुढे चिंता वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यातील एकूण ८७९ लघु, मध्यम, मोठ्या, प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा,मांजरा व रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ६६.७५ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामध्ये सर्वात कमी निम्न दुधना प्रकल्पात ५६ टक्के त्या पाठोपाठ माजलगावमध्ये ५८ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ६२ टक्के,निम्नमनार व विष्णुपुरीत प्रत्येकी ६७ टक्के, सीना कोळेगावमध्ये ७२ टक्के, जायकवाडीत ७७ टक्के,येलदरी व मांजरामध्ये ८० टक्के, येलदरी व ऊर्ध्व पैनगंगा या दोन्ही प्रकल्पात प्रत्येकी ८२ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम ७५ प्रकल्पात ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये १६ प्रकल्पात ५६ टक्के, लातूर मधील ८ प्रकल्पात ५७ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात ६३ टक्के, परभणीतील दोन प्रकल्पात ६४ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ६६ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पात ६७ टक्के तर जालन्यातील ७ मध्यप्रकल्पात सर्वात कमी केवळ ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
७५१ लघु प्रकल्पांमध्ये ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे त्यामध्ये सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पात केवळ ३५ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पात केवळ ४० टक्के, परभणीमधील २२ व छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघु प्रकल्पात सरासरी ४३ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ४५ टक्के ,धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ५० टक्के, लातूरमधील १३५ प्रकल्पात ५८ टक्के तर नांदेडमधील ८० लघु प्रकल्पातून ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
अजून उन्हाळ्याचे प्रमुख तीन महिने जाणे बाकी आहे .त्यानंतर पावसाळ्याला सुरवात झाल्यास प्रकल्पांमध्ये पाणी कधी साठले जाते त्यावर पाण्याचा प्रश्न अवलंबून असणार आहे. पाऊस सरासरीत चांगला दिसत असला तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा सिंचन पिण्याचे पाणी व वापराचे पाणी यात किती काळ व किती आधार देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
३१ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली
मराठवाड्यातील २९ लघु व दोन मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा आताच्या घडीला जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या दोन मध्यम प्रकल्पात धाराशिव व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
दुसरीकडे ज्योत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पात जालन्यातील व धाराशिवमधील प्रत्येकी १०, बीडमधील ५, लातूर व नांदेडमधील प्रत्येकी एक तर हिंगोलीतील दोन प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.