Onion Rate : आठ क्विंटल कांदा विक्रीतून उरला केवळ एक रुपया
सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वत्तसेवा
नगर ः तीन महिने मेहनत करून कांदा (Onion) पिकवला. सत्तर किलोमीटरवरून आणून बाजारात कांद्याच्या सतरा गोण्यांची विक्री केली.
त्यानंतर खर्च वजा जाऊन केवळ एक रुपया शिल्लक राहिला. नगर जिल्ह्याला लागून असलेल्या बाबी (ता. आष्टी, जि. बीड) येथील नामदेव लटपटे (Namdeo Latpate) या शेतकऱ्याला नगरच्या बाजारात हा अनुभव आला.
आठ क्विंटल कांद्यातून केवळ एक रुपया शिल्लक राहिला. मात्र तो एक रुपयांही मिळाला नाही, उललट मलाच खर्चापोटी १४० रुपये भरावे लागले, असे शेतकऱ्याने सांगितले.
अशा प्रकारातून सध्या कांदा उत्पादकांची कशा प्रकारे हेळसांड होत आहे असल्याची वास्तवता पाहायला मिळत आहे. कांद्याला सध्या दर मिळत नसल्याचे राज्यात चित्र आहे.
नगर येथील बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवार, बुधवार व सोमवारी कांदा लिलाव होत आहेत.
नगरपासून सत्तर किलोमीटर असलेल्या बावी (ता. आष्टी) येथील नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी चार दिवसांपूर्वी नगर येथे कांदा बाजारात १७ गोण्या कांद्याची विक्री केली. ८४४ किलो वजन भरले. दोन रुपये किलो दराने १६८८ रुपये मिळाले.
मात्र इतर खर्चापोटी १६८७ रुपये खर्च जाऊन १ रुपया शिल्लक राहिल्याचे संबंधित शेतकऱ्याला कांदापट्टी मिळाली. मात्र अजून खर्चापोटी १४० रुपये भरावे लागले. त्याचा उल्लेख कांदापट्टीत नाही असे शेतकऱ्याने ‘अॅग्रोवन’शी बोलताना सांगितले.
सोलापूरला एका शेतकऱ्याला दोन रुपयांचा धनादेश दिला होता. येथे तर तब्बल सतरा गोण्या कांदा विक्रीतून एक रुपयाच उरला. कांदा विक्रीतून पैसे तर मिळाले नाहीच, उलट पदरचे पैसे भरून परत यावे लागल्याचा प्रकार घडला.
शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलतेच्या या प्रकाराने शेतकऱ्यांत मात्र संताप व्यक्त केला जात आहे.
कांदा द्यायला नकार दिला, पण...
कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने सांगितले, की कांद्याचा लिलाव झाल्यानंतर दोन रुपये दर मिळाला. त्यामुळे मला कांदा द्यायचा नाही.
पुढच्या बाजाराला पुन्हा घेऊन येईन, असे सांगत कांदा द्यायला नकार दिला; परंतु तोपर्यंत संबंधित व्यापाऱ्याच्या कामगारांना मी सांगत असलेल्या बाबीकडे दुर्लक्ष करत माझ्या लिलाव झालेल्या कांद्याच्या गोण्या वाहनात भरून नेल्या.
शेतकऱ्यांना ठरवून मारले जात आहे. शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.
सतरा गोण्या कांदा विकून पदरात काहीच पडले नाही. उलट मलाच पैसे भरावे लागले. कसे करणार, दोन रुपये किलो कांद्याला दर असतो का, ज्या शेतात राबलो, पीक काढले त्यासाठी केलेला चार-पाच हजारांचा खर्च अजून द्यायचा आहे. शेतकऱ्यांना किती छळणार, कोणी तरी शेतकऱ्यांचा वेदना जाणून घेणार कधी.
- नामदेव पंढरीनाथ लटपटे, शेतकरी, बावी, ता. आष्टी, जि. बीड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.