Pune News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता.१३) मतदान झाले. या टप्प्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामीण मतदार संघ असलेल्या शिरूर मतदार संघात कांदा, सोयाबीनसह दूध आणि बिबट्याचा प्रश्न सर्वाधिक गाजला.
यामुळे बहुतांश शेतकरीबहुल असलेल्या मतदार संघात कांदा कोणाला रडविणार आणि कोणाला हसविणार, हे येत्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
गेल्या महिनाभरापासून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत प्रचार गेला होता. प्रचारामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विकासावर मतांचा जोगवा मागितला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार यांनी कांदा, दूध, शेतीमालाचे दर आणि बिबट्या या प्रश्नांसह शेवटच्या टप्प्यात विरोधी पक्षाचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या उद्योग व्यवसायासह, बॅँक आणि जमीन बळकविण्याचे मुद्दे प्रचारात आणून प्रचार वैयक्तिक पातळीवर आणला.
खासदार कोल्हे कांदा प्रश्न जोरकसपणे मांडण्यात यशस्वी झाले. त्या तुलनेत आढळराव पाटील यांना कोल्हे यांचे मुद्दे खोडून काढता आले नाहीत. तर आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्या निष्क्रियतेबरोबरच शिरूर मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र सरकारची गरज आणि निधी लागणार असून, विकासासाठी मते द्या असे मुद्दे मांडले. विकासामध्ये विविध महामार्ग, मेट्रो विस्तार, खिरेश्वर ते भीमाशंकर पर्यटन क्लस्टर आदी मुद्दे मांडले.
घटलेला टक्का कोणाची धाकधूक वाढविणार?
मतदानाचा घटलेला टक्का दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढविणारा आहे. मात्र दोन्ही उमेदवारांचे प्रमुख कार्यकर्ते आणि विश्लेषक घटलेल्या मतदानाचा फायदा आम्हालाच होणार असल्याचे दावे करत आहेत. यामुळे नक्की कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.
मतदानाची टक्केवारी
मतदार संघ... २०२४ ची टक्केवारी... २०१९ ची टक्केवारी...कमी झालेली टक्केवारी
जुन्नर --- ५६.३५...६४.६५--- ८.३
खेड ---- ५५.२९...६२.२०--- ६.९१
आंबेगाव --- ६१...७०.१३--- ९.१३
शिरूर --- ५३.५...६१.४५--- ७.९५
भोसरी --- ४६.२१...५७.६५--- ११.४४
हडपसर --- ४५.३६...४७.९४--- २.५८
यंदा कोणत्याही लाटेशिवाय निवडणूक
२०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिका टिपेला होती. ही मालिका ऐन निवडणुकीच्या काळात संथगतीने चालवत भावनिकतेकडे नेली होती. याचा फायदा कोल्हे यांना झाला होता. तर माळी समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळणार असल्याने माळी समाजाचे एकगठ्ठा मतदान २०१९ ला कोल्हे यांच्या पारड्यात पडले होते.
मात्र या निवडणुकीला कोणतीही मालिका नसल्याने, तसेच त्यांची मतदार संघातील गैरहजेरी याचा तोटा कोल्हे यांना बसणार का, हा प्रश्न आहे. तर आढळराव पाटील यांची मतदार संघातील उपलब्धतता आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मनसे यांची रसद आणि विकासकामे आढळराव यांना तारणार का, हे मतमोजणीनंतरच समजणार आहे.
दोन्ही उमेदवारांकडून दोन लाखांच्या मताधिक्याचे दावे
शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांनी आपण दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे दावे केले आहेत. यामुळे कोणाचा दावा खरा ठरतो आणि कोण विजयी होतो हे ४ जून रोजीच कळणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.