Lok Sabha Election : कांद्याने कोल्हेंना हसवले, आढळरावांना रडवले

Shirur Lok Sabha Election : पुणे जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामीण मतदार संघ असलेल्या शिरूर मतदार संघात कांदा, सोयाबीन, दूधदर तसेच बिबट्या आणि पक्षनिष्ठा याभोवती प्रचार फिरला.
Amol Kolhe Shivajirao Adhalrao
Amol Kolhe Shivajirao AdhalraoAgrowon

Pune News : पुणे जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामीण मतदार संघ असलेल्या शिरूर मतदार संघात कांदा, सोयाबीन, दूधदर तसेच बिबट्या आणि पक्षनिष्ठा याभोवती प्रचार फिरला. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमदेवार डॉ. अमोल कोल्हे यांना झाला. प्रचारात कांदाप्रश्‍न प्रभावीपणे हाताळल्याने कांद्याने विजय सुकर करत, कोल्हे यांना हसवले, तर शेती प्रश्‍न प्रभावीपणे न मांडता आल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शिवाजीराव आढळराव पाटील यांना कांद्याने रडविले.

शिरूर लोकसभेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. पहिल्या टप्प्यात निवडणूक आढळराव पाटील यांच्या बाजूने एकतर्फी वाटत असली, तरी अभिनय कौशल्य आणि संवादफेकीतून कोल्हे यांनी कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. हा मुद्दा शेतकऱ्यांना भावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हे यांच्या पारड्यात मते टाकली. याचा फायदा कोल्हे यांना झाला. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्ष फुटीमुळे मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा कोल्हे यांना झाला.

Amol Kolhe Shivajirao Adhalrao
Shirur Lok Sabha Election : शिरूरमध्ये कांदा कोणाला रडविणार, कोणाला हसविणार?

याउलट आढळराव पाटील यांनी गेली पाच वर्षे सातत्याने जनसंपर्क ठेवून स्वतःची प्रतिमा सर्वसामान्यांना सदैव उपलब्ध अशी केली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी विविध खेड्यापाड्यांना दिला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश मतदारांसह राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांना रूचला नाही आणि त्याचा तोटा त्यांना झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसने आढळरावांना नाकारले

निवडणुकीच्या ऐनवेळी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात प्रवेश करून निवडणुकीला नशीब अजमाविणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सपशेल नाकारल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अजित पवार गटाचे पाच आमदार सोबत असून एकाही मतदार संघात आढळराव पाटील यांनी मताधिक्य मिळू शकले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेच आढळराव पाटील यांनी नाकारल्याचे चित्र आहे.

Amol Kolhe Shivajirao Adhalrao
Onion Rate: कांदा, कापूस, सोयाबीन धोरण भोवले

शिवसेना ठाकरे गटाने कोल्हेंना स्वीकारले

शिवसेना ठाकरे गटाने कोल्हे यांना स्वीकारत जोमाने काम केले. याचा फायदा कोल्हे यांनी जुन्नर आणि खेडमध्ये झाला. या दोन्ही मतदार संघातील कोल्हे यांना मताधिक्य विजयाकडे दमदार वाटचाल करणारे ठरले. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला मिळणार, की शिवसैनिकांची ससेहोलपट होणार हे पाहावे लागणार आहे.

मी विजयी झालेल्या उमेदवाराचे अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून जोमाने जनकल्याण होवो अशी आशा बाळगतो. संघर्षात जय पराजय हा आलाच. या उलट खचून न जाता पुन्हा त्याच तळमळीने आणि ध्येयाने जनतेचे प्रश्‍न सोडविणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी जनतेला वचन देतो की जनसेवेचे घेतलेले व्रत कायम असणार आहे. मी प्रचारात दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यावर माझा भर असणार आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट
शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदारांना पक्ष निष्ठा आणि स्वाभिमानाला स्वीकारत मला पुन्हा विजयी केले. हा विजय सर्व तळागाळातील मतदार आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा आहे.
- अमोल कोल्हे, खासदार, शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com