
Gandhinagar News : कांदा बाजारभाव घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंमत तूट भरपाई योजनेअंतर्गत प्रतिक्विंटल २०० रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
गुजरातचे कृषिमंत्री राघवजीभाई पटेल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी याबाबत सांगितले, २०२४-२५ या हंगामात गुजरातमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यात लाल व पांढऱ्या कांद्याची जवळपास ९३,५०० हेक्टरपर्यंत लागवडीत वाढ झाली आहे. सरासरी उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे.
त्यामुळे अंदाजे २४८.७० लाख क्विंटल उत्पादन झाले आहे. याचा परिणाम होऊन गुजरात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये स्थानिक उत्पादन असलेल्या लाल आणि पांढऱ्या कांद्याची आवक वाढल्याने दर उत्पादन खर्चापेक्षा कमी झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी गुजरात सरकारने प्रतिशेतकरी २५० क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल २०० रुपये ज्याची मदत मर्यादा ५० हजार रुपये इतकी असेल, १ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान बाजार समिती आवारात विक्री झालेल्या कांद्याला ही मदत दिली जाणार आहे. ही मदत म्हणजे केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजनेचा एक भाग आहे. या माध्यमातून गुजरातमध्ये किंमत तूट भरणा यंत्रणेद्वारे ती लागू केली आहे.
योजनेसाठी १२४.३६ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली. ज्याचा फायदा राज्यातील ९०,००० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असे सांगितले जात आहे. आर्थिक मदतीसाठी पात्र असलेले शेतकरी १ ते १४ जुलैपर्यंत i-Khedut 2.0 या गुजरात सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करू शकतात. ही योजना गुजरात सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या फलोत्पादन संचालनालयाद्वारे लागू करण्यात आली आहे.
कांदा उत्पादन व दरासंबंधी अडचणी सोडवण्यासाठी गुजरात सरकारने गेल्या ७ वर्षांत पाच वेळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात दिलासा दिला. त्यामुळे काही अंशी उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी व आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी मदत होत असल्याची माहिती गुजरातमधील कांदा बाजारभाव अभ्यासक व महुआ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्यामभाई पटेल यांनी दिली.
महाराष्ट्रात कांदा उत्पादकांना दिलासा कधी?
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील कांदा पीक अडचणीत सापडले. कांदा बियाण्यांचे वाढलेले दर, मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान, दुबार कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी वेळ व खर्च, लागवड खर्चात दुपटीने वाढ त्यात उष्णतेमुळे तापमानात वाढ झाल्याने उत्पादनात घट व काढणी अवस्थेत मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.
सध्या कांदा टिकवणक्षमताही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटना यांच्याकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कांदा उत्पादकांना दिलासा कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.