
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांद्याची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वच भागात उन्हाळ (रब्बी) कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचा वीस टक्क्यांनी वाढला आहे. मजुरांचीही टंचाई आहे. अडचणीवर मात करत शेतकरी कांदा लागवड करत आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी खरीप, लेट खरीप, रब्बीचे मिळून साधारण पावने दोन ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे क्षेत्र असते. दर मिळत नसल्याची ओरड असूनही गेल्या चार पाच वर्षांपासून लागवड क्षेत्र टिकून आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दर चांगला असल्याने यंदा लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. खरीप, लेट खरीप, रब्बीत मिळून यंदा आतापर्यंत दोन लाख एकराचा टप्पा ओलांडला आहे. यंदा मात्र कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कांदा लागवडीसाठीचा खर्च यंदा वाढला आहे.
नांगरट, रोटा, वाफे पाडणे, दंड यासाठीच्या ट्रॅक्टर अथवा बैलमजुरीचा खर्च पंधरा ते वीस टक्के वाढलाय. कांदा लागवडीसाठी मजूर एका एकराला यंदा दहा हजारांऐवजी बारा हजार रुपये घेतात. शिवाय त्यांना जाण्यायेण्यासाठीचे वाहन, नाष्ट्याचा खर्चही करावा लागतो. खताचे दरही पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढलेले आहेत. बियाणे, रोपांची खर्च पंधरा टक्क्यांनी वाढला आहे. कांदा काढणीपर्यंत यंदा एकरी साठ हजारांच्या ऐवजी अशी हजारांपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. अडचणीवर मात करत कांदा लागवड होत असली तरी कांदा बाजारात येत असलेल्या मे-जूनच्या काळात कांदा दर कसा राहील याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे.
काही भागात रोपे पडून
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी तालुक्यातील काही भागात कांद्याची रोपे यंदा पडून आहेत. परतीच्या पावसाने कांदा रोपांचे सर्वाधिक नुकसान झाले. महागडे कांदा बियाणे वाया गेले. पुन्हा मिळेल तिथून बियाणे आणून लागवड करण्यात आली. आता उन्हाळी कांदा लागवड पूर्ण होत आल्याने शिल्लक रोपांना कोणी विचारेना. त्यामुळे रोपे शिल्लक आहेत. एक एकर रोपांसाठी एकवीस हजारांचा खर्च येतो. जे शेतकरी रोपे विक्री करतात, त्यांची रोपे पडून असल्याने आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
अचानक पाणी पातळी खालावतेय
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. मात्र बहुतांश काळ मसळधार पाऊस झाला. त्यामुळे पीक स्थिती चांगली होती. पावसाची नोंदही प्रशासनाकडे झाली. मात्र अधिक काळ पाणी वाहते झाले नाही. मुरपावसामुळे पाणी देण्याची गरज पडली नसल्याने स्रोत भरलेले होते. नोव्हेंबरमध्ये रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी उपसा सुरू झाला आणि पाणीपातळी खाली गेली. पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा, शेवगाव, पारनेर भागांतील अनेक ठिकाणी झपाट्याने पाणी पातळी खाली जात असून स्रोताचे पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.