
Ahilyanagar News : राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्यासाठी कार्यरत असलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर तीन वर्षांपासून मानधनाबाबत अन्याय केला जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. यामुळे बीटीएम (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) एटीएम (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) यांनी कृषी विस्तार व्यतिरिक्त अन्य अतिरिक्त कामे पंधरा दिवसांपासून (१४ जानेवारी) थांबवली आहेत.
मानधनात दर वर्षी १० टक्के वाढ देण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध पत्रांचा वेगवेगळा अर्थ काढून हे वाढ बंद केल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत कृषी विभागाच्या योजनांबाबतचा विस्तार, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, तंत्रज्ञान पोचवणे या कामासाठी २०१० कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाची (आत्मा) निर्मिती करण्यात आली. यासाठी कंत्राटी पद्धतीने बीटीएम (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) एटीएम (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) नियुक्त केले.
कालांतराने या कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या मूळ कामाशिवाय परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना, स्मार्ट, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापना प्रचार व प्रसार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व इतर अनेक योजना, तसेच तालुकास्तरीय विस्तार विषयाचे अतिरिक्त काम देण्यात आले.
२०१४ पासून मानधनात देण्यात येणारी दहा टक्के वाढ मात्र २०२१ पासून थांबवली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी कृषी विभाग आणि शासनाकडे वारंवार लेखी, तोंडी मागणी केली. मात्र सरकारकडून अजूनही दखल घेतलेली नाही. आत्मा कर्मचाऱ्यांसोबत शासन दुटप्पी भूमिका घेत आहे.
आत्मा कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये शासनाकडून न्यायालयात देण्यात येणाऱ्या शपथ पत्रामध्ये आत्मा कर्मचारी हे केवळ एकाच योजनेच काम व दहा टक्के मानधन वाढ प्रति वर्ष देण्यात येत असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु प्रत्यक्षात आत्मा योजने व्यतिरिक्त इतर अनेक योजनांचा भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर देऊन मानधन एप्रिल २०२१ पासून दहा टक्के वाढ दिली नाही.
आत्माचे प्रकल्प संचालक, प्रकल्प उपसंचालक व नोडल अधिकारी स्मार्ट इत्यादी त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत येणाऱ्या सर्वच योजनांचा आढावा घेण्यात येतो. परंतु आत्मा कार्यालयात क्षेत्रीय स्तरावर काम करण्याकरिता केवळ बीटीएम (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) एटीएम (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) ही कंत्राटी पदे उपलब्ध असून वरिष्ठ स्तरावरून विचारणा होत असलेल्या सर्वच योजनांचा भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येत आहे. असे असताना दहा टक्के मानधन दिले जात नाही. विस्तार कामासाठी २०१० पासून पाच हजार रुपये दिले जात होते, चौदा वर्षांनंतरही त्यात वाढ नाही.
दर वर्षी दहा टक्के तरी आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची त्वरित दखल घेऊन २०२१ पासून कमी करण्यात आलेले मानधन पूर्ववत करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी आत्मा कर्मचाऱ्यांनी विस्तार व्यतिरिक्त अन्य योजनांचे काम थांबवले आहे. त्यामुळे आत्माच्या योजनांवर परिणाम होऊ लागला आहे.
दहा फेब्रुवारीपासून आंदोलन करणार
कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत राज्यात ५०९, तर अहिल्यानगर जिल्ह्यात २७ कर्मचारी कार्यरत आहेत. मानधन तसेच दहा टक्के वाढीबाबत शासनाकडून निर्णय घेतला नाही. १० फेब्रुवारीपासून पुण्यात कृषी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे आत्मा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.