
Mumbai News: सरकार चांगले काम करत असतानाही मंत्र्यांच्या वाचाळपणामुळे त्यावर पाणी पडत आहे. त्यामुळे यापुढे ते सहन केले जाणार नाही. माध्यमांशी जरूर बोला, पण अनावश्यक बोलू नका असे सांगत, यापुढे चूक झाली तर माफी नसेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिला.
मंगळवारी (ता. २९) अधिवेशनानंतर प्रथमच मंत्रालयात दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांची शाळा घेतली. मात्र यामुळे थेट भ्रष्टाचाराचे अरोप असलेल्या मंत्र्यांना अभय दिल्याचेही मानले जात आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहातील रमी खेळण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. त्यावरून वातावरण तापले होते. तसेच शिंदे गटाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह भाजपचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वागणे आणि बोलण्याने सरकारची बदनामी झाली होती.
गृहराज्यंमत्री कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकून महिला आणि अन्य कर्मचाऱ्यांना अटक केली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आरोप करून रान उठवले होते. तसेच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी पैशांनी भरलेली बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या पूजेचे फोटोही व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीका करण्यात आली होती.
मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू केली होती. मात्र कृषिमंत्री कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बाकीचे विषय मागे पडले होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण दौऱ्यादरम्यान योगेश कदम यांच्या मागे खंबीर उभे राहू, असे सांगत अभय दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तुमचा निर्णय मीच घेईन : मुख्यमंत्री
सरकार सत्तेत येऊन सात महिने झाले आहेत. मात्र एकापाठोपाठ एक वादग्रस्त विषय समोर येत आहेत. यापुढे ते खपवून घेणार नाही. सरकार चांगले काम करत असताना केवळ या प्रकरणांमुळे त्यावर पाणी पडत आहे. तुमच्या खात्याशी संबंधित विषय असेल तर तर्कावर माध्यमांशी बोला. योग्य खुलासा द्या.
अनावश्यक बडबड करू नका. तसेच माध्यमांशी कमी बोला, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यापुढे समजून घेतले जाणार नाही. तुम्हाला ही शेवटची संधी आहे. यापुढे चुकलात तर कारवाई करेन, असे सांगत घटकपक्षांच्या मंत्र्यांनाही तुमचा निर्णय मीच घेईन, असा इशारा दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.