
Nashik News : द्राक्षांना अधिक दर मिळवा यासाठी अनेक शेतकरी आगाप छाटण्या घेत असतात. द्राक्ष बागा पाणी उतरण्याच्या तसेच काढणीच्या अवस्थेत आहेत. मालाची उपलब्धता कमी असल्याने आकर्षक दर होते. मात्र पावसामुळे रात्रीतून होत्याचे नव्हते झाले. हलक्या ते मध्यम पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेल्याचे शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाल्याची वेदनादायक परिस्थिती आहे.
सप्टेंबर महिन्यात आगाप छाटणी झालेल्या बागा ऑक्टोबरमधील पावसाने नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या. तर वाचलेल्या बागांची आता पावसाने दैना केली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ७ वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यांनतर मध्यरात्री व शनिवारी (ता. २८) पहाटे व सकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष बागांना तडाखा दिला. दिंडोरी, चांदवड, निफाड व सिन्नर तालुक्यांतील पाणी उतरण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये माण्यांना तडे जात असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी जिल्ह्यात हे संकट कोसळले आहे.
कसमादे भागात पूर्वहंगामी बागांचे क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर घटले. मात्र काही शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल रंगीत वाणांची लागवड केली. तर किरकोळ प्रमाणात सफेद वाणांच्या लागवडी आहेत. सटाणा तालुक्यात रंगीत वाणांचे खुडे बाकी असले तरी नुकसान तुलनेत कमी आहे. तर काही ठिकाणी सफेद वाणांचे खुडे बाकी आहे. तेथे काही प्रमाणात हे नुकसान आहे.
द्राक्षासारख्या संवेदनशील पिकात शेतकऱ्यांसमोर आव्हानांची मालिका कमी नाही तर वाढतच असल्याची स्थिती आहे.पारंपारिक वाण ज्यामध्ये थॉमसन, सुधाकर अशा सफेद वाणांना तडे गेल्याचे सिन्नर तालुक्यातील सोनांबे, कोनांबे, सोनारी व डुबेरे या द्राक्ष पट्ट्यात पाहायला मिळत आहे. तर दिंडोरी तालुक्यातील मोहाडी व चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात काळ्या व रंगीत द्राक्ष वाणांना तडे गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
सध्या नॉन युरोपियन देशांमध्ये द्राक्ष निर्यात सुरू आहे. त्यामध्ये रशियासह आखाती देशांमध्ये माल पाठवला जात होता. मात्र पावसामुळे निर्यातीच्या कामात काही अंशी अडथळे येऊन खुडे थांबल्याची स्थिती आहे. निर्यातक्षम द्राक्ष माल खराब झाल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसल्याने एकाच रात्रीत शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे.
निसर्गाने घात केला...
१२५ रुपयांनी व्यवहार, रात्रीतून कष्टावर पाणी वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील द्राक्ष उत्पादक बाबाजी सलादे यांनी कातरत्या हा वेदना मांडली. त्यांच्या फ्लेम या रंगीत वाणांची काढणी सुरू होणार होती. निर्यातदाराने प्रति किलो १२५ रुपये प्रमाणे सौदा होऊन काढणी सुरू होणार होती. मात्र पावसाने द्राक्ष मालाचे होत्याचे नव्हते झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने हा माल चालणार नाही, असे निर्यातदारांनी सांगितले. २०० क्विंटलच्या जवळपास माल होता, मात्र निसर्गाने घात केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.