Nagpur News : माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी असलेल्या जिल्हा बॅंकेतील कोट्यवधी रुपयांच्या रोखे खरेदी घोटाळ्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी आता मंगळवारी (ता. २८) निकाल जाहीर केला जाणार असल्याने या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.
जिल्हा बॅंकेने २०२१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंटस प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडीकेट मॅनेजमेंट सर्व्हीसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हीसेस मुंबई यांच्याकडून बॅंकेच्या रक्कमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते.
त्यांनतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व बॅंकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप आहे. याप्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
हा खटला तेव्हापासून प्रलंबित आहे. विविध कारणांमुळे खटल्यावरील सुनावणी तातडीने पूर्ण होऊ शकली नाही. एकूण ११ पैकी ९ आरोपींविरोधात दोषारोप निश्चीत करून हा खटला चालविण्यात आला.
संबंधित आरोपींमध्ये सुनील केदार, बॅंकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, मुख्य हिशेबनीस सुरेश दामोदर पेशकर, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, अमित सीतापती वर्मा, महेंद्र राधेशाम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार यांचा समावेश आहे.
इतर दोन आरोपींपैकी रोखे दलाल संजय हरिराम अग्रवाल यांच्याविरोधातील खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जे.व्ही. पेखले-पूरकर यांच्या समक्ष खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर तब्बल २२ वर्षानंतर या प्रकरणी मंगळवारी (ता. २८) अंतिम निर्णय येणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.