राजेश उरकुडेAI in Solving Farming Challenges: कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि ‘एआय’सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्यात देशातील शैक्षणिक संस्था काहीशा मागे पडत आहेत. यावर सर्वांत प्रभावी तोडगा म्हणजे बहूविद्याशाखीय गटकार्यावर (मल्टी-डिसिप्लिनरी टीमवर्क) भर देणे. त्यासाठी प्राध्यापकांनीच चिकित्सक बुद्धीने पुढे येत विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. .देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्थांमध्ये (उदा. आयआयटी, आयआयएम) एक उत्तम सोय आहे, ती म्हणजे तेथील प्राध्यापक संस्थेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना सल्ला सेवा पुरवू शकतात. याच धर्तीवर, आपल्या कृषी आणि अन्य विद्यापीठांमध्येही व्यवस्था करता येईल. त्यातून संस्थांना व त्या प्राध्यापकांनाही उत्पन्नाची एक मोठी संधी उपलब्ध होईल..विद्यार्थ्यांना सोबत घेत विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करता येईल. त्यातून विद्यार्थ्यांनाही एखादी समस्या सोडविण्यासाठी कशा प्रकारे विचार करावा, यासोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळेल. हीच तंत्रज्ञाने विविध स्पर्धांमध्ये मांडल्यास पुरस्कारही उपलब्ध होतील. हेच घटक विद्यार्थी, प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहन देतील, यात शंका नाही..Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या....अनेकदा एखादी क्लिष्ट समस्या (Problem Statement) घेऊन काम करताना काही महिन्यांत त्याचे उत्तर मिळेल असे नाही, त्यासाठी काही वर्षेही लागू शकतात. अशा वेळी शिक्षण संपवून एखादा विद्यार्थी टीममधून बाहेर पडल्यास, प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन त्याच्या जागी नवीन विद्यार्थ्याची निवड करून प्रकल्प अविरतपणे पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे..शाश्वततेसाठी ‘इनोव्हेशन सायकल’कुठल्याही नवकल्पनेचे प्रत्यक्ष बाजारात टिकू शकणाऱ्या उत्पादनात रूपांतर करण्यासाठी एक सुनियोजित प्रक्रिया म्हणजेच ‘सस्टेन्ड इनोव्हेशन सायकल’ राबवणे गरजेचे आहे. ‘टीसीएस फाउंडेशन’च्या नाशिक येथील ‘डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर’चे (DISQ) मॉडेल याचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण केवळ संशोधक न राहता, सामाजिक जाणीव असणारे यशस्वी उद्योजक बनतात..या प्रवासाचे मुख्य टप्पे१. मल्टी-डिसिप्लिनरी टीमची रचना :कृषी क्षेत्रातील विद्यार्थी : संघात कृषी किंवा संलग्न शाखेचा विद्यार्थी अनिवार्य असावा. त्याचे काम प्रत्यक्ष शेतातील समस्या, पिकांचे अर्थशास्त्र आणि शेतकऱ्यांची मानसिकता तांत्रिक टीमला समजावून सांगणे हे असेल.अभियांत्रिकी/आयटीचे विद्यार्थी : कोडिंग, सेन्सर्स, डेटा ॲनालिटिक्स, ड्रोन किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्स विकसित करण्याची जबाबदारी यांची असेल.मॅनेजमेंट/एमबीएचे विद्यार्थी : तयार झालेले तंत्रज्ञान बाजारात कसे विकायचे, किंमत (Cost-effectiveness) शेतकऱ्याला परवडणारी कशी ठेवायची आणि त्याचे स्टार्टअपमध्ये कसे रूपांतर करायचे, याचे नियोजन हे विद्यार्थी करतील..२. शेताकडून लॅब, लॅबकडून शेताकडे :पहिली पायरी (प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन) : टीमने शेताच्या बांधावर किंवा मार्केटमध्ये जाऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी शोधल्या पाहिजेत.दुसरी पायरी (सोल्यूशन डेव्हलपमेंट) : तांत्रिक विद्यार्थ्यांनी कृषी विद्यार्थ्याच्या सल्ल्याने त्यावर ‘एआय’ किंवा साधे, स्वस्त आयओटी (IoT) तंत्रज्ञान वापरून उपाय शोधावा.तिसरी पायरी (ग्राउंड टेस्टिंग) : तयार केलेले मॉडेल थेट शेतात नेऊन त्याची चाचणी घ्यावी. त्यामुळे प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या अडचणी, जाणवणाऱ्या त्रुटी सुधारता येतील. त्यातून सर्वसमावेशक डिझाईन (Inclusive Design) तयार करणे महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यास सोपे, परवडणारेच असावे.. Agriculture Technology: मशागतीसाठी कल्टिवेटर, पॉवर हॅरो निवडताना....स्थानिक कल्पकतेला साथमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुर्गम भागातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि अडचणींवर मात करत अप्रतिम साधने, यंत्रे विकसित केली आहेत. त्याला ‘जुगाड’ म्हणून हिणविण्याची फॅशन शास्त्रज्ञांमध्ये आहे. उलट तंत्रज्ञान विकसित करू पाहणाऱ्या अशा प्रगतिशील शेतकरी, ग्रामीण तरुणांना हेरून कृषी महाविद्यालयांनी त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यापीठे आणि भागीदार संस्थांच्या अत्याधुनिक लॅब्स, तांत्रिक साधने आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे पाठबळ मिळाल्यास हे स्थानिक प्रकल्प दर्जेदार व्यावसायिक उत्पादन म्हणून बाजारपेठेत येऊ शकतात. .त्यातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. यासाठी पुढील वर्षाच्या ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकॅथॉन’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५ ही कृषी विद्यापीठांनी आपापल्या स्तरावर जिल्हा आणि प्रादेशिक पातळीवर ‘मिनी हॅकॅथॉन’ किंवा ‘आयडियाथॉन’ आयोजित करावे. परिसरातील स्थानिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांशी अधिकृत सामंजस्य करार करून आंतर-महाविद्यालयीन कल्पकतेला हक्काचे व्यासपीठ द्यावे..ॲग्री हॅकॅथॉन केवळ पीक पद्धतीपुरती मर्यादित न ठेवता त्यात पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन आणि रेशीम शेती या सर्व पूरक विभागांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आजचा हवामान बदलाचा काळ पाहता शेतकरी केवळ पिकांवर अवलंबून न राहता एकात्मिक शेती करत आहे. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत पशू, दुग्ध व मत्स्य व्यवसायाचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. अशा तंत्रज्ञान स्पर्धा वारंवार आयोजित करणे शक्य नाही; त्यामुळे हॅकॅथॉनची ‘थीम’ निवडताना सर्व संलग्न विभागांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल हे पाहता येईल. त्यातून खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानाचा आधार मिळेल. .शिक्षणाचा मूळ हेतू केवळ पदव्या देणे नसून समाजाच्या प्रत्यक्ष समस्या सोडवणे हा आहे. ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’सारख्या स्पर्धांमधून पुढे येणाऱ्या नवकल्पनांना जर शाश्वत स्टार्टअपमध्ये रूपांतरित करायचे असेल, तर अशा बहूविद्याशाखीय दृष्टिकोनाची देशाला मोठी गरज आहे. जेव्हा तंत्रज्ञान, तरुण आणि योग्य मार्गदर्शन यांचा असा त्रिवेणी संगम होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तळागाळातील समस्यांची उकल करणारे सामाजिक स्टार्टअप्स जन्माला येतात. पुढील वर्षाच्या ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकॅथॉन’मध्ये केवळ तांत्रिक देखावा नसेल, तर महाराष्ट्राच्या मातीतील खऱ्या समस्या सोडवणारे ‘कृषिपुत्र’ आणि ‘तंत्रज्ञ’ एकाच मंचावर एकत्र काम करताना दिसतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.राजेश उरकुडे, ९९३०३०५७५४लेखक ‘माहिती तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापर’ या विषयाचे अभ्यासक आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.