
Mumbai News : सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांचा सुस्थितीतील बारदाना स्वीकारावा, अशी सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (ता. ८) बैठकीत केली. तसेच सोयाबीन खरेदीला ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बारदाना उपलब्ध करून न दिल्याबद्दल बैठकीत ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना रावल यांनी चांगलेच सुनावले. तसेच वखार महामंडळ आणि पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही कडक शब्दांत सूचना दिल्या.
सोयाबीन खरेदीचे १५० कोटी रुपये थकले असून, पुढील तीन दिवसांत तीन टप्प्यांत देण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. तसेच पुढील सोयाबीन खरेदीची रक्कम सात ते दहा दिवसांत द्यावी, अशी सूचना करण्यात आली.
बैठकीत कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी सोयाबीन खरेदीत ‘नाफेड’ मोठा घोळ घालत आहे. बारादाना उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. जर बारदाना पुरवणार नसाल तर शेतकरी ज्या बारदान्यातून सोयाबीन आणतो तोच बारदाना स्वीकारावा. ‘नाफेड’कडून जेव्हा बारदाना उपलब्ध होईल तेव्हा तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली.
यावर रावल यांनी अशा प्रकारे सोयाबीन खरेदी करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना करत शेतकऱ्यांच्या बारदान्यातील सोयाबीन स्वीकारा, अशी सूचना केली. तसेच ‘नाफेड’कडून बारदाना उपलब्ध झाल्यानंतर तो परत करा अशी सूचना केली.
‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या ५६२ केंद्रांवर खरेदी सुरू असून, २ लाख ६ हजार ९९० शेतकऱ्यांकडून ४ लाख २६ हजार ८७ टन सोयाबीन खरेदी केले आहे. मात्र बारदाना खरेदी नसल्याने सोयाबीन खरेदीही थांबली आहे. परिणामी, नाफेडने एकदा वापरलेला परंतु त्यावर प्रिंट असलेला बारदाना सोयाबीन खरेदीसाठी वापरण्यास ‘नाफेड’ने परवानगी दिल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.
मात्र मार्केटिंग फेडरेशनने बारदान्यासाठी निविदा काढली असून ती आज उघडण्यात आली. मात्र पुन्हा एकदा ‘नाफेड’ने जुना बारदाना स्वीकारला जाणार नाही, असे सांगितले आहे. हा मुद्दा मार्केटिंग फेडरेशनने बैठकीत उपस्थित केला. यावरून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत असून खरेदी कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला.
१५ तारखेला रकमेचा अहवाल द्या
कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बारदान्यासह थकलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित केला. यावरही ‘नाफेड’च्या अधिकऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पणनमंत्री रावल यांनी शेतकऱ्यांना दहा दिवसांच्या आत रक्कम अदा करा. किती पैसे अदा केले आहेत त्याचा सविस्तर अहवाल १५ जानेवारी रोजी सादर करा, असे आदेश दिले.
या वेळी आमदार कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अप्पासाहेब धुळाज, अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, ‘नाफेड’चे राज्य प्रमुख भव्या आनंद यांच्यासह जिल्ह्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बारदाना खरेदी पारदर्शक पद्धतीने करा
बारदाना खरेदीसंदर्भात पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी सूचना रावल यांनी केली. सोयाबीन खरेदी आणि शेतकऱ्यांना मिळणारा परतावा यासंदर्भात क्षेत्रीय अधिकारी यांनाही माहिती मिळावी व पारदर्शक कारभार व्हावा यासाठी वेळोवेळी पोर्टलवर माहिती अद्ययावत करा. पोर्टल अपडेट असले पाहिजे, असेही रावल म्हणाले.
‘ग्रेडरची संख्या वाढवा’
अनेकदा वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये लवकर गाड्या रिकामी होत नसल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर पणन महामंडळ, वखार महामंडळ आणि नाफेडने समन्वय ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी यंत्रणा तयार करा अशी सूचना रावल यांनी दिली.
खरेदीला मुतदवाढ
‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ची खरेदी १२ जानेवारीपर्यंत करण्यात येणार होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मुतवाढीची मागणी होत होती. हा मुद्दा पणन विभागाने बैठकीत उपस्थित केला. त्या वेळी ८ फेब्रुवारीपर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.