Mumbai News : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. राऊत यांनी, 'काल पर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पंतप्रधान मोदी यांच्यावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून टीका करत होते. पण आज ते मोदी भक्त झाले आहेत', अशी टीका केली आहे. त्यांनी ही टीका मुंबईत रविवारी (३१ रोजी) पत्रकारांशी बोलताना केली.
पुढे राऊत म्हणाले, 'शिंदे आणि अजित पवार आज मोदी, मोदी करत आहेत. ते मोदी भक्त झाले आहेत. असो, पण त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आधी सोडवावेत. हे सरकार आल्यापासून विदर्भात १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा पश्चिम विदर्भातला, मराठवाड्यातला आहे.
यवतमाळमध्ये गेल्या १५ दिवसात ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे चित्र असतानाही आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांचे सरकार योग्य दिशेने चालयं असे म्हणत आहेत. ते खोटं बोलत आहेत.' अशी टीका राऊत यांनी केली आहे.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही. शेतकरी कुटूंबाच्या किंकाळ्या दिसत नाहीत. राज्यात बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. ते त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी दीड वर्षात फक्त आमदार आणि खासदारांचा भाव वाढवले' असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
अमली पदार्थाचे रॅकेट
यावेळी राऊत यांनी शिंदे यांच्यावर जोरदार निशाना साधताना, शिंदे यांनी शिवसेनेचे नाव चोरले. यावर ते बोलतात. मग त्यांनी याबाबत बोलावे, अजित पवार यांनी बोलावे की, राज्यातला एकही उद्योग, रोजगार बाहेर जाऊ देणार नाही”. मात्र त्यांच्यात ही बोलण्याची हिंमत नाही. देशात अमली पदार्थाचे रॅकेट सुरू आहे. त्याचे केंद्रस्थान गुजरातमध्ये आहे. यातील सर्वाधिक अमली पदार्थ महाराष्ट्रात येत आहेत असाही आरोप राऊत यांनी केला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.