Pune News : राज्यातील महायुतीचे सरकर खोके, महागळती आणि लिकेज सरकार आहे. त्यांचे वरती आणि खाली देखील महागळती सरकार आहे. आयोध्येत राम मंदिराच्या गाभ्यात गळती लागली असून राज्यात पेपरही लिक होत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा एक देखील निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे सरकारला लाज लज्जा, शरम कशी नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (गुरूवारी ता.२७) विधानभवानात आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
महायुतीच्या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून निरोप घेणारे अधिवेशन आजपासून सुरू झाल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच यंदाच्या अधिवेशानात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. पण गेल्या दोन वर्षांत जो घोषणांचा पाऊस पाडला. यातल्या किती घोषणा पूर्ण केल्या? एवढं जरी महायुतीतील नेत्यांनी खरेपणाने सांगितलं तरी खूप, असाही टोला ठाकरे यांनी लगावलाय.
तसेच राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करताना सरकारने पूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी केली. ठाकरे म्हणाले, राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. रोज एक शेतकरी एकट्या अमरावतीत आत्महत्या करत आहे. यावर महायुती सरकार शांत आहे. शिंदे सत्तेत येताना म्हणाले होते की, माझ्या राज्यातला शेतकरी आत्महत्या करणार नाही. पण जानेवारीपासून आतापर्यंत १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. तर आपल्या मुख्यमंत्र्यांची पंचतारांकीत शेती आहे. शिंदे अमावस्या पौर्णिमेला वेगळं पिक काढतात. हेलिकॉप्टरने शेती करायला जाणारे शिंदे एकमेक शेतकरी असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
राज्यात अद्यापही पाऊस पडला नसून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या दोन वर्षात सव्वा सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज नऊ शेतकरी आत्महत्या करत आहे. सरकारने कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांना आता कोणी वालीच राहिलेला नाही. शेतकऱ्यांची १० हजार २२ कोटींची नुकसान भरपाई थकीत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येणं बाकी आहे. त्यामुळे आता थापा आणि घोषणा सरकारने थांबवाव्यात. निवडणुका अद्याप तीन महिने लांब आहेत. सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी. जशी आम्ही आमच्या सरकारच्या काळात नागपूर अधिवेशनात केली होती. शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. पण महायुतीच्या सरकारने आम्ही दिलेली कर्जमाफी रखडवली, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
तर शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे मिळत नसून एक रुपयात पिकविम्याची घोषणा सरकारने केली. पण शेतकऱ्यांच्या हातात फक्त ७० रुपये पडले आहेत. त्यामुळे एनडीएच्या डबल इंजिन सरकारने पीक कर्जाची माफी द्यावी. निवडणुकीच्या आत कर्जमाफी करून फडणवीस यांनी अंमलबजावणी करावी, असेही ठाकरे यांनी मागणी केली आहे.
मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची घोषणा करतील अशी शक्यता असल्याचे ठाकरे म्हणाले. तर या घोषणेचे स्वागत असून सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'बरोबरच 'मुख्यमंत्री लाडका भाऊ' अशी योजना देखील सुरू करावी. कारण मुलांना देखील एखादी योजना असावी, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.