
Nashik News : आस्मानीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माडसांगवी (जि. नाशिक) येथे बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विचारले असता कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद उफाळून आला.
आता या मुद्द्यावर त्यांनी दोन पावले मागे जात दिलगिरीही व्यक्त केली. मात्र ‘‘शेतकरी पुत्र आहात, शेतकऱ्याचे दुःख समजून जबाबदारीने बोला’’ असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला.
बुधवार (ता. २) व गुरुवार (ता. ३) सलग दोन दिवस नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ६ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात कांदा, गहू, हरभरा, डाळिंब, द्राक्ष व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. या वेळी ‘‘पंचनामे करून शासनाच्या निकषाप्रमाणे मदत दिली जाईल’’ असाही शब्द दिला.
कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? शेतीत गुंतवणूक करता का? असे प्रश्न कृषिमंत्री कोकाटे यांनी विचारले होते. मात्र शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना ते चुकले.‘‘शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात’’ हे विधान केल्याने राज्यभरातून विरोधक व शेतकरी नेत्यांनी चौफेर टीका केली. आता त्यांनी विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांची शेतीत वाटचाल सुरू आहे. शेतकरी शेतीमाल उत्पादन घेतात. मात्र केंद्र शासनाच्या हस्तक्षेपामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
मात्र शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असतानाही मंत्री कोकाटे यांनी अशा प्रकारची व्यक्तव्य करू नये, असे शेतकऱ्यांनी रोखठोकपणे सुनावले आहे. ‘‘तुम्ही शेतकऱ्यांना अपमानित करू नका. तुमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, तर या सत्तेचा उपयोग तुम्ही शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे भले करण्यासाठी करा’’ या शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली
निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमधील मंत्र्यांनीच कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना अपमानित करणे पूर्णपणे चुकीचे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. याचे भान मंत्र्यांनी ठेवावे.
कृषिमंत्री कोकाटे असतील किंवा सरकारमधील सर्व मंत्री यांनी स्पष्ट बहुमतातील सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी करावा उगीचच शेतकऱ्यांना व जनतेला अपमानित करू नये, या शब्दात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कृषिमंत्र्यांना यांना सुनावले आहे.
शेतकरी म्हणाले...
शेतकऱ्याच्या मुलाकडून ही अपेक्षा नाही.
वैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीची समजदारीची भाषा अपेक्षित आहे.
कृषिमंत्री यांची शेतकऱ्यांविषयीची काही वादग्रस्त विधाने चुकीची व अशोभनीय.
शेतकऱ्यांना देखील सन्मानाची वागणूक अपेक्षित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.