
Pune News: वीजग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरणकडून सुरू केले असून याद्वारे वर्क फ्रॉम करणाऱ्यापासून सर्व घटकांना व्यावसायिक (कमर्शिअल) वीज बिल आकारणार आहे. त्याविरोधात सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती दि सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयेश अकोले यांनी दिली.
महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) च्या वतीने प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात पुण्यातील पत्रकार भवन येथे सोमवारी (ता.१७) पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी श्री. अकोले बोलत होते. श्री अकोले म्हणाले, की केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
मात्र, त्याला पूर्णपणे हरताळ फासण्याचे काम महावितरण करत आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार असल्याचे लक्षात येताच महावितरणने अनेक जुलमी नियम व अटी बनविण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
तयार झालेल्या वीज युनिटचा हिशोब ठेवणाऱ्या नेटमीटरसाठी टीओडी मीटर देऊन नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी त्यांचे वीजबिल शून्य न होता, नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे सूर्यघर योजनेच्या मूळावर घाला घालण्याचे काम या टीओडी मीटरच्या माध्यमातून होणार आहे. सौर यंत्रणा बसवून ग्राहकाचे वीजबिल शून्यावर येणार आहे. परिणामी महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्याचा महसूल कमी होणार आहे. घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर लावला, तरी टीओडी मीटरप्रमाणे बिल मिळण्याबाबत स्वातंत्र्य असावे असा आग्रह आहे.
पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते. तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात. आर्थिक वर्ष संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो. वर्षअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते. ही यंत्रणा सुरळीत राबविण्यासाठी नेटमीटर बसवण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकाना देण्यात आलेले हे नेटमीटर स्मार्ट मीटर नव्हते. मात्र, आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसविणार असून, ते टीओडी अर्थात टाइम ऑफ डे मीटर असतील.
टीओडी मीटरमुळे ग्राहकांना होणारे तोटे :
रुफटॉप रेग्युलेशन्स २०१९ नुसार टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात (ऑफ पीक) तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे.
योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या युनिटची भरपाई (दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही.
सौर यंत्रणेमधून दिवसा वीज तयार होते. तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला या टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही.
महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सौरवीज त्याच काळात न वापरल्यास ती ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील.
वर्षाखेर तेवढ्याच युनिटपोटी महावितरणकडून ३ ते साडेतीन रुपयांप्रमाणे पैसे मिळतील, दरम्यान ग्राहकांनी रात्री वापरलेल्या विजेसाठी बिल भरावेच लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.