
Pune News : अकोला जिल्ह्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसान भरपाईपोटी शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. मात्र आता हिच मदत परत करण्याची नोटीस शासनाने काढली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून तब्बल तीन कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली जाणार आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी, अवेळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने याबाबत निर्णय घेत २०२३ मध्ये नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. मात्र आता जमा केलेली रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. याबाबत ऑडिट विभागाने शासनाला माहिती दिली आहे.
ऑडिट विभागाने शासनाला मंजूर रकमेपेक्षा जास्त मिळालेली रक्कम वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून राज्य सरकारने महसूल विभागाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर तेल्हारा तालुक्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या नोटीसप्रमाणे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यात तीन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. जो मर्यादेपेक्षा अधिक आहे. असाच प्रकार बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली असून जास्तीची मिळालेली रक्कम शासनाकडे जमा करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
महसूल विभागाच्या ऑडिटनंतर हे प्रकरण उघड झाले असून आता रक्कम वसूल केली जाणार आहे. याबाबत महालेखाकार मुंबई यांनी महसूल विभागाला सूचना केली असून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर कारवाईच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी अधिकच्या रकमेचा भरणा सुरू केला आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयावरून आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने नोटीस पाठवून निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना त्या रोखण्याऐवजी, कर्जमाफीची घोषणा करण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.
निवडणूक कालावधीत शेतकरी लाकडा म्हणत अनेक घोषणा केल्या. आता मात्र त्यावर ब्र शब्द देखील काढला जात नाही. शेतकऱ्यांना देण्याचं सोडाच, उलट आला मागच्या वर्षी मिळालेली अतिवृष्टीची मदत देखील परत घेतली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळेच या सरकारला शेतकऱ्यांचे काहीच सोयरसुतक नसून शेतकरी मेला तरी यांना त्याचे काही पडलेले नाही, असा घणाघात शेतकऱ्यांनी सरकारवर केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.