Indrajit Bhalerao : उतारांचा त्रास महानोरांना छळून गेला !

Article by Indrajit Bhalerao : वयाच्या २३ व्या वर्षी १९६५ मध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख समकालीन कवींचा ‘पुन्हा कविता’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला.
Namdeo Dhondo Mahanor
Namdeo Dhondo MahanorAgrowon

N D Mahanor : महानोरांच्या चरित्राकडं पाहिलं, की आपल्या लक्षात येतं वयाच्या २३ व्या वर्षी १९६५ मध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख समकालीन कवींचा ‘पुन्हा कविता’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याला सामान्य रसिकांपासून, विचारवंत समीक्षकांपासून, सर्वोच्च स्थानी असलेल्या राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांची एकमुखाने पसंती मिळाली.

वयाच्या २९ व्या वर्षी १९७१ मध्ये त्यांचा ‘वही’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी १९७२ मध्ये त्यांची भारतातल्या सर्व भाषांमध्ये अनुवादित झालेली ‘गांधारी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. वयाच्या ३२ व्या वर्षी १९७४ मध्ये पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अख्ख्या मराठी रसिकांसमोर त्यांच्या कवितासादरीकरणाचं कौतुक झालं.

पु. ल. देशपांडेंसारख्यांनी त्यांच्या कवितेचं कौतुक केलं. याच संमेलनात यशवंतरावांनी त्यांचं कवितावाचन प्रथमच ऐकलं. तेव्हापासून ते महानोरांचे कायमचे चाहते झाले. वयाच्या ३५ व्या वर्षी १९७७ मध्ये त्यांना मराठी चित्रपट सृष्टीत सर्वोच्च स्थानी असलेल्या मंगेशकर कुटुंबानं काढलेल्या आणि पुढं तुफान लोकप्रिय झालेल्या चित्रपटात गीत लिहिण्याची संधी मिळाली.

Namdeo Dhondo Mahanor
Indrajit Bhalerao : महानोरांच्या कवितेला सुगीचे दिवस

वयाच्या ३६ व्या वर्षी १९७८ मध्ये त्यांना यशवंतरावांच्या पसंतीची पावती म्हणून सन्मानानं विधान परिषदेची आमदारकी मिळाली. वयाच्या ३८ व्या वर्षी १९८० मध्ये त्यांनी देशभर गाजलेल्या आणि सर्व विरोधी पक्ष सहभागी असलेल्या शेतकरी दिंडीचं संकल्पन आणि सांस्कृतिक नेतृत्व केलं. वयाच्या ४० व्या वर्षी १९८२ मध्ये पावसाळी कविता हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

पुढं दोनच वर्षांनी १९८४ ला म्हणजे वयाच्या ४२ व्या वर्षी महानोर मराठवाडा साहित्य परिषदेचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले. वयाच्या चाळिशीपर्यंत एवढी तुफान लोकप्रियता याआधी केवळ वि. स. खांडेकर यांनाच मिळालेली होती. सोलापूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वयाच्या चाळिसाव्या वर्षीच वि. स. खांडेकर अध्यक्ष झाले होते.

Namdeo Dhondo Mahanor
Indrajit Bhalerao : महानोरांनी भालेरावांना लिहीलेलं पत्र !

हे सगळं महानोरांनी पळसखेडसारख्या एका डोंगरदऱ्यातल्या, खूप लहानशा गावी राहून केलं. महानगरातल्या लेखकांचेही जितके नसतील तितके संपर्क महानोरांनी या गावात राहून जगाशी ठेवले. त्या काळातला त्यांचा पत्रव्यवहार पाहिला, की हे आपल्या लक्षात येतं. त्यांचं शरीर शेतात राबत होतं पण त्यांचा आत्मा मराठी वाङ्‍मयव्यवहारात गुंतलेला होता.

ही मराठी वाङ्‍मयव्यवहारातली एक विलक्षण गोष्ट होती. जी महानोर यांनी अति प्रयत्नानं साध्य केलेली होती. महानोरांना साहित्य अकादमी मिळायला मात्र उशीर झाला. तोपर्यंत ते साठीला पोहोचलेले होते. त्यांच्या पिढीतल्या चित्रे, नेमाडे यांना तो सन्मान जरा लवकर मिळाला होता.

२००१ ला ‘तिची कहाणी’ या कवितासंग्रहासाठी त्यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. २००९ ला ज्ञानपीठाखालोखाल महत्त्वाचा समजला जाणारा जनस्थान पुरस्कार त्यांना मिळाला. तेव्हा त्यांचं वय ६७ होतं. वयाच्या चाळिशीनंतर त्यांच्या आयुष्यात चढ-उतार येत राहिले. चाळिशीपर्यंत मात्र त्यांची कमान केवळ चढतीच होती. सतत चढ पाहिलेल्या माणसाला उतारांचा जास्तच त्रास होतो. तो त्रास चाळिशीनंतर महानोरांच्या वाट्याला सतत आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com