
Nagpur News: मूग पीक काढणीच्या अवस्थेत आले असताना त्यावर तणनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे या पिकाची पाने जळाली. पीक परिपक्व झाले असल्यामुळे मळणी यंत्राच्या साह्याने काढणी सोपी झाली. परंतु यामुळे मूग विषयुक्त झाल्याचा दावा करीत मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने मूग खरेदीस नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारकडून २०२४-२५ या वर्षात मुगाला ८७६८ रुपये हमीभाव होता. त्यानंतर २०२५-२६ या वर्षाकरिता यात ८६ रुपयांची वाढ करून ८६८२ रुपये असा हमीभाव देण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील १६ जिल्ह्यांत शेतकरी उन्हाळी मुगाची लागवड करतात. दरवर्षी या उत्पादित मुगाची हमीभावाने खरेदी होते. २०२४-२५ या वर्षात २० मे दरम्यान नोंदणीला सुरुवात झाली होती. या वर्षी मात्र अद्यापपर्यंत हमीभावाने खरेदीसाठी कोणत्याच हालचाली शासनस्तरावर नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्य सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी मुगाच्या व्यवस्थापनात कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यासोबतच हंगामाच्या अखेरीस यंत्राच्या साह्याने मळणीवर भर दिला जात आहे. त्याकरिता या पिकाची हिरवी पाने जळावी यासाठी तणनाशकाचा वापर होतो. तणनाशकाच्या वापरामुळे मुगाचे पीक हे विषयुक्त होते, असे सांगितले जाते.
सरकारकडून बाजार हस्तक्षेप योजना राबविली जात असल्याने खुल्या बाजारात देखील मुगाला चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा हमीभाव खरेदीकडे लागलेल्या असतात. मात्र यंदा हमीभावाने खरेदी होणार नसल्याने खुल्या बाजारात ६ ते ७ हजार रुपये क्विंटलने मूग विकावा लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दोन ते अडीच हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागेल, अशी भीती आहे. व्यापाऱ्यांकडून देखील कमी दरात मुगाची खरेदी होणार असल्याने उत्पादकता खर्चाच्या भरपाईचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
या वर्षी एकरी साडेतीन क्विंटल इतकी अत्यल्प उत्पादकता या पिकातून झाली आहे. तर दुसरीकडे हमीभाव खरेदीचा तिढा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर लवकरच तोडगा न काढल्यास या विरोधात आंदोलनाची तयारी देखील मध्य प्रदेशातील काही शेतकरी संघटनांनी चालविली आहे. तर अशा प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे जर पीक विषयुक्त होत असेल तर त्याच्या विक्रीवर सरकार स्तरावरून बंदी का आणली जात नाही, असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
दर दबावात
सरकारच्या हमीभावाने मूग न खरेदीच्या निर्णयानंतर नरसिंगपूर बाजार समितीत मुगाचे दर ५५०० रुपये क्विंटलवर आले आहेत. या बाजारात रोज ४००० क्विंटल मुगाची आवक होत आहे.
नरसिंगपूर जिल्ह्यात चार टक्के क्षेत्रावर ऊस तर मध्य प्रदेशातील एकूण लागवडीच्या ९६ टक्के क्षेत्रावर मूग होतो. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास कोणत्याही कीटकनाशकाचा प्रभाव दोन दिवसांनंतर राहत नाही. मात्र शेतीचा गंध नसलेल्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सरकारकडून अशाप्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, अशी माहिती नन्हेगाव येथील राव गुलाबसिंग लोधी यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.