
Kalyan News: कल्याण तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षणाचे आयोजन गावपातळीवर केले जाते. याच अनुषंगाने कल्याण तालुक्यातील पळसोली गाव परिसरात दीपक चव्हाण यांच्या मयंक कृषी पर्यटन पळसोली केंद्रात एसआरटी भातलागवड, पेरणी यंत्राने, साच्याच्या साह्याने भातलागवडविषयी शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत एसआरटी भातलागवड, पट्टा पद्धत, यंत्राद्वारे लागवड करणारे सर्व प्रगतशील शेतकरी; तसेच पंचक्रोशीमधील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रसाद भोकरे यांनी एसआरटी भातशेतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. एसआरटी शेतीमुळे जमीन मशागत, बियाणे, खते, मजूर इत्यादी गोष्टींचा खर्च कमी होतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सगुणा राईस तंत्र (एसआरटी) ही भातलागवडीची एक नवीन पद्धत आहे, जी शून्य मशागत आणि संवर्धन कृषीवर आधारित आहे. या पद्धतीत नांगरणी, गाळ काढणे आणि लावणी न करता, कायमस्वरूपी उंच वाफ्यांवर भातलागवड केली जाते. सगुणा राईस तंत्र या पद्धतीमुळे भात लागवडीचा खर्च कमी होतो, उत्पादन वाढते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.
उपकृषी अधिकारी विजय पाटील यांनी यंत्राद्वारे भातपेरणीमधील बारकावे, बियाणे व खते व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तालुका तंत्र व्यवस्थापक वैशाली भापसे यांनी जमीन आरोग्य पत्रिका महत्त्व, माती नमुना कसा घ्यावा, गटाचे अहवाल जतन करणे, बचत जमा करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शेतकरी दीपक चव्हाण यांनी मागील वर्षीचा एसआरटी शेतीचा अनुभव सांगितला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एसआरटी शेतीकडे वळावे, असे आवाहन शेतकरी वर्गाला केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी, चंदन कडव, पुंडलिक चौधरी, जयवंत दिवाणे, शरद दिवाणे, भास्कर दिवाणे, शिवाजी चौधरी, तेजस तारमले, श्रीराम पालवी उपस्थित होते.
एसआरटी पद्धतीमुळे भातलागवडीचा खर्च ३० ते ४० टक्क्यांनी कमी होतो. उत्पादन वाढते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. ही पद्धत पर्यावरणपूरक आहे. कारण त्यात रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि जमिनीची धूप थांबते. नांगरणी आणि इतर मशागतीचे काम कमी झाल्याने श्रमाची बचत होते.
कशी आहे एसआरटी पद्धत?
एसआरटी पद्धतीमध्ये शेतात उंच गादी वाफे तयार केले जातात. गादी वाफ्यावर ठराविक अंतराने भातबियाणे टोकले जातात. जमिनीत ओलावा टिकून राहील; परंतु पाणी साठून राहणार नाही, अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केले जाते.
तण नियंत्रणासाठी नांगरणी, खड्डा खोदणे आणि कोळपणी टाळली जाते. आंतर मशागतीसाठी कोळपणी यंत्र वापरले जाते. खत आणि बियाणे यांचा योग्य वापर केला जातो, ज्यामुळे खर्च कमी होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.