
आरोग्याच्या (Health) दृष्टीने पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम (Exercise) आहे. छंद, आनंद, खेळ आणि आरोग्यासाठी प्रामुख्याने पोहणे पसंत केले जाते. नदी, (River) नाला, तलाव असो की विहीर पूर्वी ग्रामीण भागात पट्टीचे पोहणारे अनेक जण असत. परंतु आजकाल आपण पाहतोय पट्टीच्याच काय, तर पोहणाऱ्यांचीच उणीव ग्रामीण भागात भासत आहे. स्मार्ट फोनच्या जगात एकंदरीतच मैदानी खेळ कमी झाले असून, त्यात पोहणे तर फारच मागे पडले आहे.
पूर्वी शेतात जाऊन झाड-वेलींच्या सावलीत गारव्याला पहुडणे, कैऱ्या खाणे आणि मस्त नदी-विहिरींच्या थंड पाण्यात मनसोक्त पोहणे यात बच्चे कंपनी दिवसभर रमून जात होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भर दुपारी घाम-गर्मीपासून सुटका आणि शरीराचा व्यायाम असा दुहेरी हेतू पोहण्याने साध्य होत असे. त्यामुळेच बच्चे कंपनी जमली, की प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणे, पाण्यातला लपंडाव, एकमेकांना शिवणे असे खेळ रंगत असतं. या सर्व माहोलमध्ये पोहता न येणारे देखील भोपळा, ट्यूब बांधून पाण्यात उड्या घेत आणि लवकरच पोहायलाही शिकत.
आता मात्र राज्याच्या बहुतांश भागात नद्या उन्हाळ्यात आटत आहेत. विहिरीही तळ गाठून असतात. मुख्य म्हणजे पोहण्यासाठी पाणी उपलब्ध असले, तरी आताची तरुण पिढी स्क्रीनवरून हटायला तयारच नाही. त्यामुळे पोहणे हा प्रकार मागे पडत आहे. अशा परिस्थितीत शिरूर तालुक्यातील (जि. पुणे) केंदूर गावात पोहण्याची कला नव्या पिढीकडे हस्तांतरित व्हावी म्हणून बाळासाहेब भैरवकर मुलांना प्रशिक्षणाचे धडे देत आहेत.
एक व्यायाम म्हणून पोहणे संपूर्ण शरीर विकसक आहे. एरोबिक व्यायाम म्हणूनही पोहणे ओळखले जाते. हृदय निरोगी ठेवायचे असेल तर चालायला आणि पोहायला सुरुवात करा, असा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. पोहण्याने हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहते. पोहण्याने वजन कमी होते. स्नायू-हाडे मजबूत होतात. पोहण्याने रक्त पंप करण्याची क्षमता वाढते. शरीराची ऊर्जा वाढते. कमी रक्तदाब राखण्यासाठी दररोज ३० मिनिटे पोहणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांगासाठी उपयुक्त व्यायाम म्हणूनही पोहण्याकडे पाहिले जाते.
पाण्यात राहण्याचा आनंद लुटता येतो. मोठे ताण-तणाव दूर होतात. पाण्यात बुडी मारून तरंगत राहिल्यास बरे वाटते. श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढते. शरीराची लवचिकता वाढून आरामदायी वाटते. असे असताना व्यायाम तसेच खेळ म्हणूनही पोहणे हा प्रकार आपल्याकडे दुर्लक्षित राहिला आहे. राज्याच्या बहुतांश भागात बारमाही नद्या राहिल्या नाहीत. गाव तलाव, बारव गाळ-कचऱ्याने भरून इतिहासजमा झाले आहेत. विहिरीतही पावसाळा सोडला तर पोहण्यासारखे पाणी राहत नाही.
मोठे गाव, तालुक्याच्या ठिकाणी पण राज्यात जलतरण तलाव अजूनही उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात पोहण्याला खूपच मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांतील उच्चभ्रू वर्गापुरता छंद म्हणून पोहणे आता उरले आहे. काही ठिकाण तलाव, कालवे, विहीर, खाड्या, समुद्रात पोहण्याचे प्रयत्न होत असले, तरी प्रशिक्षक तसेच जीवनरक्षकाच्या अभावामुळे बुडून मरण्याच्या दुर्घटना घडत आहेत.
पोहण्याकडे केवळ छंद म्हणून न पाहता एक स्पर्धात्मक खेळ म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. खेळातील करिअर म्हणून पोहण्याकडे पाहायचे असेल, तर राज्यातील मोठी गावे, तालुक्यांच्या ठिकाणी जलतरण तलाव झाले पाहिजेत. तिथे चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती शासनाने करायला पाहिजे. खेड्यातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी जिथे शक्य होईल तिथे ही कला नव्या पिढीकडे हस्तांतर करायला पाहिजे.
छोट्या गावांपासून ते महानगरांपर्यंत पोहण्याच्या स्पर्धा नियमित भरवायला हव्यात. त्यातील विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे मिळाली पाहिजेत. यातून चांगले पोहणारे निवडून त्यांना अधिक प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर (ऑलम्पिक) पाठविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. असे झाले तरच पोहणे ही कला करमणुकीबरोबर करिअर म्हणूनही जिवंत राहील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.