Pune News : सध्या राज्यात उन पावसाचा खेळ पाहायला मिळत असून फळबागांसह शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसल्याने तर उन्हामुळे पाणी नसल्याने पिकासह फळबांगाना फटका बसत आहे. यादरम्यान फलटण शहरात नीरा उजवा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. येथे नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी येथील कालव्याला १.२ मी. व्यासाचा भगदाड पडल्याने गळती लागला आहे. सध्या याच्या दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले असून त्यात यश मिळालेले नाही. यामुळे कालव्यात सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. तर गळती काढण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती परिपत्रकातून कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
नीरा उजवा कालवा हा ब्रिटिशकालीन असून कालव्याच्या भराव ठिकठिकाणी कमकुवत झाला आहे. यामुळे गळती लागण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले होते. मात्र येथे ५ मे रोजी फलटण तालुक्यातील कोळकी-जाधववाडी पाणीपुरवठा योजना टँक पॉइंट जवळ घळ पडून बोगद्यातून मातीमिश्रित पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले होते.
यानंतर कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली होती. त्याप्रमाणे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच पाण्याचा दबाव कमी करून भगदाड मुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात यश आलेले नाही.
सध्या नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन बंद करण्यात आले असून त्यासाठी १० मेपासून धरणातून टप्प्या-टप्प्याने विसर्ग कमी केला गेला आहे. तसेच रविवारी (ता. १२) धरणातील विसर्ग अंशतः पूर्ण बंद करत सोमवार (ता. १३) पूर्ण पाणी बंद झाले आहे.
आता प्रत्यक्ष गळतीच्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी पुढील १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले आहे. तसेच माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील न मिळालेल्या गावांसाठी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीकडे अहवाल दिला जाईल असेही माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यातील शेतीसाठी नीरा उजवा कालवा वरदान ठरला असून येथील शेती फळबागा ओलीताखाली आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात शेती आणि फळबागांना उन्हाळी आवर्तनातून पाणी मिळत होते. मात्र अचानक पाणी बंद झाल्याने 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणण्याची वेळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी
उन्हाच्या झळा बसत असल्याने शेतातील उभी पिके, फळबागा पाण्याविना करपत चालल्या आहेत. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या येथे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून काहीच दिवसांपुर्वी माढा लोकसभेचे मतदान पार पडले आहे. मतदान होताच नीरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद केल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.