
अॅग्रोवन वृत्तसेवा
भवानीनगर, जि. पुणे : इंदापूर (Indapur) तालुक्यातील सणसर रायतेमळा येथे नीरा डाव्या कालव्याला तिसऱ्यांदा भगदाड पडले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला आहे.
नक्की नीरा डावा कालवा (Nira Canal) ज्या ठिकाणी भगदाड पडून फुटत आहे तो नक्की दुरुस्त होतोय की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
सणसर रायतेमळा या ठिकाणी महिनाभरामध्ये मंगळवारी (ता. ११) पहाटे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा येथील नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
एकाच महिन्यात तीन वेळा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने नक्की या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे कशाप्रकारे काम चालले आहे, या बाबत शंका निर्माण झाली आहे.
नीरा डावा कालवा फुटल्याची माहिती समजतात दोन्ही वेळेस माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी तातडीने भेट देऊन जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे मोठे भगदाड पडले आहे.
त्या ठिकाणी चांगले ठोस पद्धतीने काम करून पुन्हा अशी घटना घडू नये, याची काळजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी याबाबत सूचना केल्या होत्या. तरी देखील मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा कालव्याला भगदाड पडून या परिसरातील असलेल्या शेतामध्ये पाण्याचे लोट वाहू लागले आहेत.
अगोदरच दोनदा कालव्याला भगदाड पडल्याने पाणी वाहिल्याने शेतातील माती वाहून गेली आहे. पिकांचेही नुकसान झाले आहे; परंतु तिसऱ्यांदा कालवा फुटल्याने जी काही उरलीसुरली होती त्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई तातडीने द्यावी
भागातील शेतकऱ्यांचे नीरा डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे शेतात पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने नुकसान झाले आहे व घराचे देखील नुकसान झाले आहे.
यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने पंचनामे करून योग्य ती कारवाईची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेऊन लवकरात लवकर भरपाई कशी मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
पाटबंधारे विभागाचा ढिसाळपणा :
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी पडलेले भगदाड हे मुरुमाच्या साह्याने बुजविले जात आहे; परंतु हे मुरुमाच्या साह्याने भगदाड बुजले जाणार नाही यासाठी चांगल्या प्रकारे मशिनच्या साह्याने दाब देऊन किंवा सिमेंट काँक्रीटचा वापर करून हे भगदाड बुजवणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा हा प्रकार घडू शकतो.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण? नक्की पाटबंधारे विभागाचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे व हे पडलेले भगदाड कायमचे बुजवले जाणार आहे का नाही, हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.