
अॅग्रोवन वृत्तसेवा
Ahilyanagar News : अहिल्यानगर ः कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे जेऊर कुंभारी (ता. कोपरगाव) येथे दोन पिढ्यापासून सुरू असलेला वाद समझोत्याने मिटला आहे. दोन वेळा न्यायालयाचा निकाल लागूनही किरकोळ गैरसमजांमुळे बंद असलेला शेतरस्ता तहसीलदारांनी बांधावरच न्यायनिवाडा करून खुला केला. तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षांचा वाद मिटल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जेऊर कुंभारी (ता. कोपरगाव) येथे दहा फूट रुंदीचा व सहाशे मीटर लांबीचा रस्ता सख्ख्या चुलत्या- पुतण्यातील वादात अडकला होता. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. हे प्रकरण दोन पिढ्यापासून सुरू होते. दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या पायऱ्याही झिजविल्या. शासकीय कार्यालयाचे हेलपाटेही झाले. दोघांच्या वेळ आणि पैसा खर्च झाला, दोनदा न्यायालयात निर्णयही झाला. असे असतांनादेखील वाद संपुष्टात येत नव्हता.
अशावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार महेश सावंत यांनी सुरू केलेल्या बांधावर न्यायनिवाडा करण्याच्या मोहिमेअंतर्गत या प्रकरणाकडे लक्ष घातले. सावंत यांनी शेतावर जाऊन वाद असलेल्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र आणले. किरकोळ गैरसमजातून दोघांचे नुकसान होत असल्याचे त्यांना पटवून दिले.
संवेदनशील पद्धतीने सामंजस्य दाखविण्याचे दोघांना आवाहन केले. एकाने मोठेपणा दाखविणे आणि दुसऱ्याने माघार घेणे यात दोघांचे मोठेपण असल्याचे सावंत आणि इतर उपस्थित पंचांनी त्यांना पटवून दिल्याने दोन्ही २ वेळा न्यायालयाचे निर्णय होवूनही न मिटलेला आपापसांतील शेतरस्त्याचा वाद मोक्यावरच मिटवून घेतला. हा शेतरस्ता आपपसांतील सहमतीने प्रतिवादीने (चुलत्याने) वादीला (पुतण्याला) मोकळा करून दिला.
...अन् चुलत्या-पुतण्यांनी मारली एकमेकांना मिठी
वादापोटी एकमेकांवर धावून जाणारे चुलते - पुतण्यांनी आपल्या भावनांना वाट करून देत एकमेकांना मिठीदेखील मारली आणि हा प्रसंग पाहून ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाने बांधावर जाऊन प्रलंबित वाद मिटवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून त्यातूनच जेऊर कुंभारी येथील अनेक वर्षांपासूनच प्रलंबित वाद मिटला असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांचे बरेचसे रस्त्यांचे वाद - विवाद हे किरकोळ गैरसमज दूर सारून आणि सामंजस्याने जागेवरच मिटू शकतात. शेतकऱ्यांना न्यायालय, पोलिस केसेस करणे परवडत नाही. यामुळे वेळेचा, पैशांचा अपव्यय तर होतोच, पण शेतीकडेही दुर्लक्ष होते. म्हणूनच अशी प्रकरणे संवादाद्वारे सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मोहीम सुरू केली आहे.
- महेश सावंत, तहसीलदार, कोपरगाव, जि. अहिल्यानगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.