Kolhapur Culture : मऊ मनाचं रांगडं कोल्हापूर

Agrowon Diwali Ank : कोल्हापूरची कोल्हापुरीयत नेमकी कशात दडली आहे, याचा घेतलेला हा धावता आढावा.
Kolhapur
KolhapurAgrowon
Published on
Updated on

अवंती कुलकर्णी

कोल्हापूर म्हटलं, की लोकांना पहिल्यांदा आठवतं ते इथलं आंबाबाईचं देऊळ, मिसळ, रंकाळा, मटण, साज वगैरे; पण याहीपलीकडं कोल्हापूरची महती आहे. कोल्हापूरचा रांगडेपणा सर्वांनाच ठाऊक असतो; पण या रांगड्या कोल्हापुरात दडलेली निसर्गाविषयीची, परंपरेविषयीची भावना कोल्हापूरचं मऊ मन अलवारपणे उघड करते. नवं अन् जुनं हातात हात घालून पुढे जात आहे, हे चित्र या शाहूनगरीत- या कोल्हापुरात- घडीघडीला दिसतं. कोल्हापूरची कोल्हापुरीयत नेमकी कशात दडली आहे, याचा घेतलेला हा धावता आढावा.

कोल्हापूर म्हटलं, की लोकांना पहिल्यांदा आठवतं ते इथलं आंबाबाईचं देऊळ, मिसळ, रंकाळा, मटण, साज वगैरे; पण याहीपलीकडं कोल्हापूरची महती आहे. कोल्हापूर म्हणजे नेमकं काय, हे अजून बऱ्याच जणांना ठाऊक नाही.

कोल्हापूरचं भौगोलिक स्थान पाहिलं, तर यासारखे संपन्न जिल्हे महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यामुळं कृषिप्रधान भारत देशातल्या या जिल्ह्यात शेती हे उपजीविकेचं साधन नव्हे तर जीवच असणारे लोक पुष्कळ आहेत. पारंपरिकरीत्या कोल्हापुरात ऊस अन् ज्वारी ही पिकं घेतली जातात. त्यातही ऊस अधिक. पण चंदगड, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा या कोकणसदृश हवामान असलेल्या तांबड्या मातीच्या प्रदेशात तांदळाचं पीक घेतलं जातं. आजरा घनसाळ हा तांदूळ तर प्रसिद्ध आहेच. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ आणि कोल्हापुरी चप्पल याला तर जीआय मानांकनही मिळालं आहे. पण कोल्हापूर म्हणजे फक्त इतकंच नाही!

कोल्हापूर म्हणजे औद्योगिकीकरणाबरोबरच कृषिसंस्कृती जपणारं गाव. कोल्हापूर म्हणजे नव्याबरोबरच जुन्यालाही मान देणारं गाव. कोल्हापूर म्हणजे ग्लोबलायजेशन बरोबरच लोकसंस्कृती जपणारं गाव. म्हणून तर आजसुद्धा इथं लोकसंस्कृतीतून, कृषिसंस्कृतीतून आलेले काही सण अगदी पारंपरिक बाजात साजरे होतातच.

Kolhapur
Market Intelligence : शेतकरी होत आहेत बाजारसाक्षर...

त्रंबोली, आंबील, पीऽऽऽ ढबाक आणि वाटे...

काही कळालं का हे वाचून? विस्कटून सांगते. आषाढ लागला की कोल्हापुरकरांची लगबग सुरू होते. एक तर इकडं पाऊस मुबलक असतो. नद्याओढ्यांना पुष्कळ पाणी येत असतं. एरवी आषाढात भाज्यांची रेलचेल असतेच; पण पुढचा महिना श्रावणाचा, नंतर काही जण चातुर्मास पाळणारे पण असतात; तेव्हा आषाढात बक्कळ मांसाहार खाऊन घेतात लोक. पण लगबग ही फक्त एवढ्यपुरतीच नसते. आषाढी एकादशी झाली, की कोल्हापुरात हरेक गल्लीत पी ढबाक, आंबील आणि वाट्याचे विचार सुरू होतात. इथली काही तरुण मित्रमंडळं पुढाकार घेऊन आपापल्या गल्ल्यांमधून मीटिंग्ज करायला सुरुवात करतात. एकादशीनंतर येणारा प्रत्येक मंगळवार अन् शुक्रवार आंबील यात्रा होते कोल्हापुरात.

आता ही ‘आंबील यात्रा’ म्हणजे काय, तर आषाढात नद्यांना नवीन पाणी आलेलं असतं अन् श्रद्धाळू लोक दरवर्षी देवीला हे नवीन पाणी नेतात; त्या बरोबर आंबील हा पदार्थ असतो. म्हणून ती आंबील यात्रा. खूप जण त्रंबोली यात्रापण म्हणतात. कारण हे पाणी मरगाई, टेमलाई म्हणजे त्रंबोली इ. देवींना जातं म्हणून ही त्रंबोली यात्रा.

हे ‘पी ढबाक’ काय, तर हे पाणी अक्षरशः वाजतगाजत देवीला नेतात. यातलं पीऽऽऽ हे पिपाणीसदृश वाद्यातून येणाऱ्या आवाजामुळं इथल्या लोकांनी दिलेलं नाव. तर ढबाक हे डफातून येणाऱ्या आवाजामुळं पडलेलं नाव आहे. खरं तर पीऽऽ म्हणजे पिपाणी नव्हेच. ते वाद्य असतं सुन्द्री नावाचं. अतिशय मंजुळ स्वर असलेलं वाद्य. सुन्द्रीचा इतिहासही गंमतशीर आहे.

सोलापूरचे थोर कलाकार बाबूराव जाधव यांना एकदा गावच्या जत्रेत एक लाकडी पिपाणी दिसली. त्यांनी ती विकत आणली आणि घरी आणून तिला पुढं ताडाची पिपाणीही जोडली. या जोडवाद्यातून येणारा स्वर एकदमच सुंदर वाटत होता कानाला, म्हणून तिचं नाव सुन्द्री असं ठेवलं. ती सुपारीच्या नाही तर खैराच्या लाकडापासून बनवतात. सोलापुरात बाबूराव जाधव यांच्या पुढच्या पिढ्यांत हा वारसा जपला गेला आहे. या वाद्याचा जगभर प्रसार व्हावा म्हणून ते अथक प्रयत्न करत असतात.

Kolhapur
Gokul Milk : गोकुळच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, अध्यक्षांकडून ५ हजार रूपये पगारवाढीची घोषणा

दुसरं वाद्य म्हणजे डफ किंवा कोल्हापुरी भाषेत डफडं. हे डफडं अगदी जोरात वाजवलं जातं. त्याला आस कमी असते, त्यामुळं त्यातून येणाऱ्या आवाजाचे तरंग अगदी क्षणभरापुरते असतात. त्यामुळं तो आवाज ‘डब डब’ असा येतो, त्याचं कोल्हापुरी भाषेत ‘ढबाक’ झालंय.

ही वाजंत्री वाजवायचा मान हा कायम कोल्हापुरातल्या होलार समाजातील उत्तम कलाकारांकडं असतो. ही आमच्या छत्रपती शाहूराजांपासूनची परंपरा आहे. म्हणजे असं ,की पिराच्या वेळीही यांना वाजंत्री वाजवायचा मान असतो अन् त्रंबोली यात्रेला पण यांचाच तो हक्क असतोय. तर नदीला नवीन पाणी आलं, की ही यात्रा काढली जाते.

मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या पहाटे नदीवर जाऊन तरुण मंडळी कावड भरून पाणी आणतात. मग गल्लीच्या कोपऱ्यावर मरगाई, टेमलाई आणि म्हसूबाच्या नावानं दगडाला शेंदूर लावतात, उदबत्ती कापरानं ओवाळतात आणि मग बकरं कापतात. हे सगळं अगदी पहाटे पहाटे होतं. सकाळ झाली की मटणाचे वाटे होतात. गल्लीतल्या घराघरांतून हे वाटे पोहोचवले जातात. तोपर्यंत एखाद्या घरात सगळा नैवेद्य तयार केला जातो.

या नैवेद्यात पिठल्याची म्हणजेच झुणक्याची वडी म्हणजेच शुद्ध भाषेत पाटवडी, मेथी, शेपूची भाजी किंवा गौरीला करतात तसली आल्यापाल्याची भाजी, वांग्याची चरचरीत भाजी, भाकऱ्या, दहीबुत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या वाडग्यात नाही तर मटक्यात आंबील... असा नैवेद्य असतो. म्हसूबा, मरगाई आणि त्रंबोलीच्या नैवेद्यात या सगळ्याबरोबर वाट्यातनं ‘काळीजा’ची भाजी करून तीपण नैवेद्य किंवा गारवा म्हणून तयार करतात.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com