
Soybean protest planned by Kisan Sabha : सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदत वाढ द्यावी, तसेच निधी तातडीने द्यावा अन्यथा कृषी मंत्रालयाच्या घरासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिला आहे. राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे. परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अजित नवले यांनी यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. नवले म्हणाले, "मोदी की ग्यारंटी म्हणून सोयाबीनचा दाणा ना दाणा खरेदी करण्यात येईल. त्याला किमान आधारभुत किंमत म्हणजेच ४ हजार ८९२ रुपयांपेक्षा जास्त भाव मिळेल, असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं. परंतु महाराष्ट्रात मात्र आज सोयाबीनच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही, ही वस्तुस्थिती आहे." याकडे नवले यांनी लक्ष वेधलं.
सोयाबीनला खुल्या बाजारात ३ हजार ९०० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर गर्दी होत आहे. परंतु खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत, असं म्हणत नवले यांनी खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी केली. नवले म्हणाले, "खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असल्याने खरेदीची मागणी करत आहेत. सरकार मात्र केवळ घोषणा करतं. पुरेशी यंत्रणा देत नाही. मुदत वाढ दिली जात नाही, निधीची उपलब्धता होत नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्यावी," अशी मागणी किसान सभेच्या वतीने नवले यांनी केली.
सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या असंतोष खदखदतोय. त्यामुळे सरकारने मुदत वाढ द्यावी, निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत सरकारला थेट आंदोलनाचा इशाराही दिला. नवले पुढे म्हणाले, "सोयाबीन प्रश्नावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. मुदत वाढून निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी तातडीने पावलं टाकावीत, अन्यथा किसान सभा रणांगणात उतरेल आणि कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करू असा इशारा देत आहोत," असं नवले यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातून १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यासाठी राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. परंतु अंतिम मुदतीपर्यंत सोयाबीनची सुमारे ११ लाख टन खरेदी केली. ६ फेब्रुवारी सोयाबीन खरेदी अंतिम मुदत असल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आली. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अडकून पडलं आहे. तसेच विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
दरम्यान, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन खरेदी मुदत वाढ मिळणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता तुरीची खरेदी सुरू होणार आहे. आधीच गोदामात सोयाबीन ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे सोयाबीनला मुदत वाढ मिळण्याची शक्यता नाही, असं पटेल यांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.