Kharif Season : पूर्व हवेलीत खरीप अडचणीत
Pune News : चालू वर्षी जून महिना संपला तरी पूर्व हवेलीत हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरिपातील पिके अडचणीत आली असून येत्या काळात पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
हवामान खात्याने यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या दहा पंधरा वर्षांत पुणे शहर व जिल्ह्यात वळवाचा पाऊस अजिबात पडत नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष सात जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राकडे लागलेले असते. यंदा मृग नक्षत्रही कोरडे ठणठणीत गेले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अनुक्रमे देहू व आळंदी येथून सुरू झाला. पुणे शहरात दोन दिवस मुक्काम करून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत; मात्र तरीही खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व पुणे जिल्ह्यात म्हणजेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मनासारखा पाऊस पडलेला नाही.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. आता रिमझिम पावसाचा आषाढ महिना सुरू होईल. तरीही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. एकीकडे मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतीक्षा कायमच आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
अनेक वर्षांनतर या वर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली.
बाजरी पिकांसाठी पावसाची गरज
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने घरी खाण्यासाठी बाजरीचे पीक घेतले जाते. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी करतात. लगेच पालखी सोहळ्यात सामील होऊन पंढरपूरला विठू माउलीच्या दर्शनाला जातात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने बाजरीचे भविष्य अवघड दिसत आहे. बाजरीचे पीक काढल्यानंतर त्याच शेतात कांद्याचे पीक केले जाते.
मुठा कालव्याला पाणी आले म्हणून...
यंदा उन्हाळ्यात नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी फक्त १५ दिवस बंद झाले होते. त्यामुळे पूर्व भागातील शेतीला व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. या पाण्याला अशुद्ध व घाण पाणी म्हणून अनेकांनी सुरुवातीला नावे ठेवली; परंतु नंतर याच लोकांनी या घाण पाण्यावरच भाजीपाला पिकवून लाखो रुपये कमावले. हे पाणी उपलब्ध झाले नसते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.