
हवामान अंदाज
मंगळवार (१ जुलै) कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात ता. २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीदरम्यान कमाल आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
खरीप भात
रोपवाटिका व्यवस्थापन
ज्या ठिकाणी भात पेरणी होऊन १५ दिवसांचा कालावधी झाला आहे, अशा ठिकाणी प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा.
रोपवाटिकेमधील तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीनंतर वाफे ओले होताच ऑक्झाडायर्जिल (६ ई.सी.) ३ मि.लि. प्रती लिटर पाणी याप्रमाणे प्रती गुंठे क्षेत्रावर ५ लिटर द्रावणाची एकसारखी फवारणी करावी. ही फवारणी पावसाचा अंदाज घेऊन उघडीप असताना करावी.
मुसळधार पावसामुळे रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास १% युरिया (१० ग्रॅम प्रति लिटर) या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
रोपवाटिकेत पेरणी झालेली असल्यास किंवा रोपे उगवून स्थिर झालेल्या ठिकाणी पावसाचे अतिरिक्त पाणी साचू देऊ नये. रोपवाटिकेच्या चारही बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
नागली, वरई
रोपवाटिका व्यवस्थापन
नागली पिकाच्या रोपवाटिकेस १५ दिवस झाले असल्यास त्यातील तणांची बेणणी करून घ्यावी. त्यानंतर युरिया खताची दुसरी मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा या प्रमाणे पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करावी.
मुसळधार पावसामुळे रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडत असल्यास १% युरिया (१० ग्रॅम प्रति लिटर) या प्रमाणात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
रोपवाटिकेमध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
वेलवर्गीय भाजीपाला
वाढीची अवस्था
पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार देण्यात यावा. मंडपाची व्यवस्था करावी.
लागवड केलेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
हळद
वाढीची अवस्था
हळद पिकामध्ये कंद माशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. या किडीचे व्यवस्थापन सुरुवातीपासूनच करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सुकी मासळी ओलसर करून भरावी. अशा चार ते पाच बरण्या शेतामध्ये ४ ते ५ फूट उंचीवर ठेवाव्यात. कंद माशीच्या माद्या या आमिषाकडे आकर्षित होतात. तिथे अंडी घालतात. साधारणपणे ४ ते ५ दिवसांनी अशी सुकी मासळी जाळून नष्ट करावी.
भाजीपाला वाढीची अवस्था
रोपवाटिकेतील वांगी, मिरची, टोमॅटो इ. भाजीपाला रोपांच्या पेरणीनंतर १५ दिवस झाले असल्यास बेणणी करून घ्यावी. जोमदार वाढीसाठी प्रती वाफ्यास ५० ग्रॅम युरिया खतमात्रा द्यावी.
रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
डॉ. व्ही. जी. मोरे, ०९४२२३७४००१
०२३५८ - २८२३८७
ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.