
Nashik News : जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १९) पार पडली. मात्र कृषी वगळता विविध विभागांची असमाधानकारक कामगिरी तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती देताना अपूर्ण माहिती सादर केल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींचा संताप पाहायला मिळाला. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
कृषिमंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी कृषी विभाग व खरीप हंगाम नियोजनसंबंधित सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. त्यानंतर कृषी संबंधित प्रत्येक विभागाचे सादरीकरण सुरू झाले. या वेळी ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. जिल्ह्यात १८,००० सौर कृषी पंप कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत हे कृषी पंप नेमके कोणत्या शेतकऱ्यांकडे बसवले आहेत, तालुकावार त्यांची यादी द्या, असे मुद्दे उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. त्या वेळी कोकाटे यांच्यासह आमदार बनकर व खोसकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अधिकारी निरुत्तर होते.
अर्धवट माहिती देऊ नका वस्तुनिष्ठ माहिती द्या, तुमच्या अनेक तक्रारी आहेत. खरी माहिती कळू द्या, असा अर्धवट कारभार चालणार नाही, असे सांगत भर बैठकीत मंत्री कोकाटे यांनी मुख्य अभियंत्यांना फोन करून कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना प्रसंगाचे गांभीर्य नसल्याचे खडेबोल सुनावले.
यानंतर अग्रणी बँकेच्या वतीने पीककर्जाचा मुद्दा उपस्थित केला. सहकारी बँकांना कर्ज वितरणात अडचणी असतील तर राष्ट्रीय बँकांनी जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी पुढे यावे अशा सूचना केल्या. तर जलसंपदा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने ते संतापले.
शासन काय आकाशातून पडलेय का?
जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीचा प्रचार प्रसार नाही. विदर्भाच्या तुलनेत नाशिक फारच मागे असल्याचे कृषिमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी रेशीम अधिकाऱ्यांनी अटीशर्तींचा पाढा वाचला. त्यावर कोकाटे पुन्हा संतापले. शासन काय आकाशातून पडले आहे का? तुम्ही अधिकारी आहात की फक्त आकडेवारी सांगणारे प्रतिनिधी? अडचणी असतील तर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला सूचना का करत नाही.
इच्छाशक्तीच नाही या शब्दात संताप व्यक्त केला. बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, ‘रामेती’चे प्राचार्य शिवाजी आमले, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे आदींसह अधिकारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
बैठकीत कृषिमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे
सौर कृषी पंप योजना ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या धर्तीवर राबवा
जलसंपदा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार
खतांचे लिंकिंग केल्यास संबंधितांवर फौजदारी करू, गरज पडल्यास अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांना देऊ
बोगस निविष्ठांमुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कंपन्यांना द्यावी लागेल
नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास एक महिन्याच्या आत भरपाईसाठी शासनाला प्रस्ताव देणार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.