Pune News : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पंजाब आणि हरियानाचे हजारो शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा शनिवारी (ता. ०९) २६ वा दिवस असून आंदोलक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. तसेच जोपर्यंत मागण्या मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत लढा देण्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. यादरम्यान शनिवारी (ता. ०९) रोहतक येथे हरियाणाच्या १०-१२ खाप पंचायतींची दिल्ली शेतकरी आंदोलनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली शेतकरी आंदोलनावर अनेक मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेताना ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तर ही समिती आपली रणनीती सायंकाळपर्यंत जाहीर करू शकते.
ही बैठक कुंडू खापचे राष्ट्रीय अध्यक्ष जयबीर कुंडू अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रीत सिंग, शेतकरी नेत्या मोनिका सिकारोली आणि सुमन हुडा उपस्थित होते. यावेळी बैठकीत शेतकरी आंदोलनाला बळकटी देण्यासाठी आणि त्याची दिशा ठरवण्याबाबत खापचे नेते आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा करण्यात आली.
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास बळ देण्यासाठी हरियाणातील खाप पंचायतींची दुपारी रोहतकच्या तितौली गावात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खाप पंचायतींमध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करून ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. ही समिती आंदोलनाच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या बैठकीत हरियाणातील १०-१२ खाप पंचायतीतील शेतकरी सहभागी झाले होते.
मात्र दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने आपली रणनीती स्पष्ट केलेली नाही. दरम्यान संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने शनिवारी दुपारीच ३.३० वाजता किसान भवन, सेक्टर ३५, चंदीगड येथे पत्रकार परिषद बोलावली होती.
यापूर्वीच संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बैठकीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सर्वतोपरी लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर आचारसंहिता लागू झाली किंवा निवडणूका लागल्या तरीही आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून त्यावर ठोस तोडगा निघेपर्यंत हटणार नाही असे म्हटले होते. तसेच शेतकरी नेत्यांनी देशभरातील इतर शेतकरी संघटनांना ६ मार्चला दिल्लीकडे कूच करण्यासह १० मार्चला रेल्वे गाड्या रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.