
Jalgaon News : खानदेशातील एकूण जलसाठा आजघडीला २४ टक्क्यांखाली आला आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या गिरणा व तापी नदीवरील हतनूर धरणातील जलपातळी चिंतेचा विषय बनली आहे. गिरणा धरणतील जलसाठा मागील महिन्यात सुमारे २३ टक्के होता. त्यात आणखी घट झाली असून, हा जलसाठा सुमारे १६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
गिरणा धरण भैौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. पण त्याचा उपयोग जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव या भागांतील २१ हजार हेक्टर शेतीसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होतो. तसेच गिरणा काठच्या सुमारे १२० पाणीपुरवठा योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत.
गिरणा धरणातून चार वेळेस नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. टंचाई दूर करण्यासाठी हे आवर्तन एक ते सव्वा महिन्यात सोडले जाते. मागील महिन्यात चौथे आवर्तन सुटले होते. गिरणा धरणातून रब्बीसही पाणी देण्यात आले.
तसेच मालेगाव औद्योगिक वसाहतीसही या धरणातून पाणी दिले जात आहे. गिरणा धरणाची एकूण साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. त्यात २०२४ मध्ये चांगला पाऊस झाल्याने १०० टक्के जलसाठा झाला होता. परंतु जलसाठा मे अखेरिस २० टक्क्यांपर्यंत आला. कारण धरणातून पाण्याचा सतत वापर होत आहे.
जामनेरातील वाघूर धरणातील जलसाठा मात्र बरा आहे. तो सुमारे ५५ टक्के आहे. कारण यातून फक्त पिण्यासाठी व अल्प क्षेत्रातील रब्बीस पाणी देण्यात आले. वाघूर धरणही १०० टक्के भरले होते.
त्यातून जळगाव, जामनेर शहर व काही गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच भुसावळ व जळगाव तालुक्यातील रब्बीस या धरणातून यंदा पाणी देण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता सुमारे नऊ टीएमसी आहे. त्यातून पाण्याचा वापर मर्यादीत असल्याने त्यातील जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातूनही पाण्याचा मोठा वापर सुरू आहे. त्याची साठवण क्षमता सुमारे आठ टीएमसी आहे. त्यात गाळही अधिक आहे. यामुळे त्यातील उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे.
तापी नदीला अनेकदा जूनमध्ये प्रवाही पाणी येते. कारण तापी नदीचे उगमक्षेत्र मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगांमधील बैतुल व लगत आहे. तसेच तापी नदीत विदर्भातील पूर्णा व जळगाव जिल्ह्यातील गिरणासह अन्य अनेक लहान मोठ्या नद्या येवून मिळतात. परंतु सातपुड्यातही यंदा पाऊस नसल्याने तापी नदीत प्रवाही पाणी नाही.
तसेच हतनूर धरणातील जलसाठा घटत आहे. या धरणातून भुसावळ शहरासह जळगावातील औद्योगिक वसाहत, भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, आयुध निर्माणीस पाणी दिले जात आहे. रावेर, यावल व चोपड्यातील रब्बीसही या धरणातून पाणी देण्यात आले. यामुळे हतनूरमधील जलसाठा ३० टक्क्यांखाली आहे.
धुळ्यातील प्रकल्पांत ४० टक्के साठा
धुळ्यातील अनेर, अमरावती, मालनगाव, जामखेली, पांझरा, सोनवद, बुराई या प्रकल्पांतील जलसाठाही ४० टक्क्यांपर्यंत आहे. नंदुरबारातील दरा, चिरडे, देहली या प्रकल्पांतील जलसाठाही ३० टक्क्यांपर्यंत आहे. जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, अंजनी, मन्याड, मंगरूळ, सुकी, अभोडा, गूळ आदी प्रकल्पांतील जलसाठाही चिंताजनक स्थितीत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.