
Sangli News : वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावातून अतिरिक्त वाहणारे पाणी वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त नलिकेद्वारे कार्वे तलावात सोडल्याने विनाखर्चात तलाव निम्मा भरला आहे. पावसाने उघडीप दिल्याने पाणीपातळी मानकरवाडी कालव्याहून कमी झाल्याने सायपन पद्धतीने कार्वे तलावात जाणारे ‘वाकुर्डे’चे पाणी बंद झाले. अतिरिक्त वाहणाऱ्या पाण्यावर ऐन पावसाळ्यात वाळवा तालुक्यातील कोरडा पडलेला कार्वे तलाव विनाखर्चाने भरण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.
वाकुर्डे येथील करमजाई तलावात उन्हाळ्यात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडले जात असल्याने या तलावाची पातळी वाढलेली असते. वाकुर्डे योजना बंद असताना पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावात ३० टक्के पाणीसाठा होता. जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने १०० टक्के भरून पाणी सांडव्यातून बाहेर पडून मोरणा धरणात जात होते. मोरणा धरणही १०० टक्के भरले होते. करमजाई तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी बंद करून ते बंदिस्त नलिकेद्वारे रेठरे धरण, कार्वे तलावात सोडल्यास वाया जाणाऱ्या पाण्यावर रेठरे धरण, कार्वे तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी केली होती.
त्यानुसार वारणा पाटबंधारे विभाग व जलसंपदा विभागाने एकत्रित नियोजन करून पाणी सोडण्यास सुरवात केली. करमजाई तलावातून बंदिस्त नलिकेद्वारे सायपन पद्धतीने पाणी जात असल्याने विजेचा खर्च होत नाही. हा प्रयोग वाकुर्डे योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदा केला गेला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.