Kalmmawadi Dam
Kalmmawadi Damagrowon

Kalmmawadi Dam : ‘काळम्मावाडी’ धरण यंदाही पूर्ण क्षमतेने भरणार नाही, गळती निघणार कधी?

Kolhapur Irrigation Department : मात्र, जलसंपदा विभागाकडून यंदा धरणात किती पाणीसाठा ठेवणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.
Published on

Kolhapur Kalmmawadi Dam Leakage : कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेल्या काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा अनेक वर्षे प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. या धरणावर लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे परंतु पाटबंधारे विभाग आणि सरकारच्या वेळ खाऊ धोरणामुळे या धरणाच्या गळतीचे काम पुढे ढकलत चालले आहे. फेरनिविदा प्रक्रियेच्या तांत्रिक बाबीने पुन्हा एकदा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणे लांबणीवर पडले.

परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही सलग तिसऱ्या वर्षी धरणात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा करावा लागणार आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून यंदा धरणात किती पाणीसाठा ठेवणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.

गळतीचे प्रमाण वाढल्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ समितीने तांत्रिक अभ्यासाअंती उपाययोजना सुचित केल्या. त्यानुसार गळती प्रतिबंधक उपाययोजनेचा आराखडा व अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरी, आर्थिक तरतुदीचे सोपस्कार झाले. निविदा निघाली कार्यवाही झाली. प्रत्यक्षात तांत्रिक बाबीमुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी झाला. आता उपाययोजनेचे काम फेरनिविदेच्या चक्रात अडकले आहे. त्यामुळे यंदाच्या मे महिन्यात काम सुरू करण्याचे नियोजन कागदावरच राहिले. आता फेरनिविदा प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच उपाययोजनेचे काम सुरू होणार असल्याने यंदाही धरणातील पाणीसाठ्यात किती घट करणार याचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

याबाबत काळम्मावाडी धरण उपविभागीय अभियंता प्रशांत कांबळे म्हणाले की, धरणात यंदाच्या पावसाळ्यात किती पाणीसाठा करावयाचा याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या स्तरावरून होणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य अभियंत्याकडे सादर झाला आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार धरणात यंदाच्या पावसाळ्यातील पाणीसाठा करावा लागेल.

Kalmmawadi Dam
Ragi Crop Kolhapur : राधानगरीत १ हजार ७०० हेक्टरवर नाचणीची लागवड

पाणीसाठी किती राहणार हे गुलदस्त्यात

तज्ज्ञ समितीने धरण सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजनेचे काम सुरू होईतोपर्यंत पाणीसाठा वीस टीएमसी इतकाच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार २०२२ च्या पावसाळ्यात धरणात २५.४० ऐवजी २० टीएमसी इतकाच पाणीसाठा ठेवला. त्यानंतर लाभ क्षेत्रात पाणी कमतरता भासेल. अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी मांडल्यानंतर गतवर्षी पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ करून, तो बावीस टीएमसी केला.

सध्या धरण निम्म्याहून अधिक भरले आहे. तरीही यंदा धरणात तज्ज्ञ समितीच्या निर्देशानुसार की गतवर्षी इतकाच करावयाचा निर्णयच जलसंपदा विभागाने गुलदस्त्यात ठेवला आहे.

पाणलोट क्षेत्रातील सततच्या अतिवृष्टीने धरणातील पाण्याची आवक दिवसागणिक मुबलक प्रमाणात वाढली आहे. अतिवृष्टी आणि पाण्याची आवक वाढतीच राहिल्यास यंदाही धरण लवकर भरण्याची शक्यताच अधिक आहे. यामुळे धरणातील यंदाच्या पाणीसाठ्याचे कोडे लवकर सुटणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com