
Nashik News : पावसाचे प्रमाण कमी असल्याने द्राक्ष हंगाम सुरवातीला अडचणीत होता. अशातच काही शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात आगाप छाटणी केली. आता पाऊस उघडल्यानंतर जिल्ह्यात बागांवर ‘स्पोडोप्टेरा लिट्यूरा’ (परिचित नाव- तंबाखूवरील पाने खाणारी अळी) या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नुकसान वाढले आहे. रात्रीच्या वेळी कोवळ्या फ़ुटीवर हल्ला करून घडाचे, द्राक्षाच्या फ़ुटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची भीती आहे.
निफाड, दिंडोरी, चांदवड तालुक्यांत प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक आहे. तर नाशिक, सिन्नर तालुक्यात हे प्रमाण तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हे नुकसान हजारो एकर क्षेत्रावर असून प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत, खेडगाव, नारायण टेंभी, दावचवाडी, बोपेगाव, सोनजांब, चिंचखेड, मातेरेवाडी, पालखेड बंधारा, वडनेर भैरव, विंचूर, रानवड, उगाव, सोनेवाडी या प्रमुख द्राक्ष उत्पादक गावांत प्रादुर्भाव दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी दिसून येणाऱ्या या अळीमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
द्राक्ष बागांच्या छाटण्या झाल्यानंतर नव्याने तयार झालेला शेंडा, फूट, लहान पाने, पोंगा व तयार झालेले घड यावर हल्ला करून ही अळी खाऊन फस्त करत आहे. दिवसभर ही अळी जमिनीवर पालापाचोळा, गवत, खोडाची साल यामध्ये लपून राहते, तर रात्रीच्या वेळी हल्ला करते. कीडनाशकांच्या फवारण्या करूनही अनेक भागांत प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी रात्रीच्यावेळी बॅटरी घेऊन स्वतः तसेच मजुरांमार्फत अळ्या गोळा करून नियंत्रण करत आहेत.
अळीमुळे होणारे प्रमुख नुकसान असे...
- नवीन फुटी, नवीन कलम केलेल्या बागा अळीच्या भक्ष्यस्थानी
- पोंगा अवस्थेतील घडांचे मोठे नुकसान
- ग्राफ्टिंग केलेल्या वेलीचा डोळा खाल्ल्यास अधिक नुकसान
- पुढील फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
- रात्रीच्या वेळेस प्रादुर्भाव असल्याने पीक संरक्षण करण्यास अडचणी
- पीक संरक्षण खर्चात वाढ
प्रा. तुषार उगले यांनी सुचविलेल्या उपाययोजना
- एकात्मिक कीडनियंत्रण व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा.
- रेसिड्यु व्यवस्थापन करताना संभाव्य अडचणी लक्षात घेऊन जैविक घटक वापरावेत
- जमिनी लगतची अळी खोडावर जाऊ नये म्हणून खोडास चिकट पट्टी लावल्यास परिणाम होतो. मित्रबुरशीजन्य कीटकनाशकाची फवारणी घेतल्यास मिलीबगसह इतर सर्व प्रकारच्या किडींचे नियंत्रण होईल. सध्याच्या वातावरणात अशा कीटकनाशकांचा वापर फायद्याचा दिसून येत आहे.
- विषाणुजन्य कीडनाशक एसएलएनपिव्ही व जीवांणुजन्य कीडनाशक बॅसिलस थुरिनजेंन्सिस यासारख्या जैविक घटकांचा वापर फवारणीतून करावा.
- एकरी १० या प्रमाणात कामगंध सापळ्यांचा वापर करावा
- छाटणी अगोदर द्राक्षबागेत बियुव्हेरिया बॅसियाना, निमोरिया रिले यासारख्या बुरशीजन्य कीडनाशकांचा वापर करावा
- मादीकडून कोवळ्या पानांवर अंडी घालण्यास सुरवात होत आहे. वांझ काडी फेलफूट काढणीदरम्यान ही पाने खुडून नष्ट करावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.